अहमदनगर – देशातील शहरांची नावे बदलणे ही तर फक्त सुरुवात आहे. भविष्यात अहमदनगर आणि हैदराबाद शहरांची नावे बदलून अहिल्याबाईनगर आणि भाग्यनगर करण्यात येणार असून 2026 पर्यंत भारताला “संयुक्त हिंदू राष्ट्र” घोषित केले जाईल, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे (भाजप) निलंबित आमदार टी. राजा सिंह यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
टी राजा सिंह म्हणाले की, हिंदू देशाला ‘संयुक्त हिंदू राष्ट्र’ बनवण्याची मागणी करत आहेत. जर 50 हून अधिक इस्लामिक देश आणि 150 हून अधिक ख्रिश्चन राष्ट्रे असू शकतात, तर भारताला हिंदू राष्ट्र का घोषित केले जाऊ शकत नाही? भारतातील 140 कोटींपैकी बहुतेक हिंदू आहेत.वर्ष 2025 आणि 2026 मध्ये भारताला ‘अखंड हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले जाईल. हे मी म्हणत नाही, ही सर्व साधू-संतांची गर्जना आहे आणि हे त्यांचे भाकीत आहे.
सिंह पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे नामांतर ही केवळ सुरुवात आहे. या नामांतरामुळे काही लोक दुखावले आहेत. जर तुमचा जन्म औरंगाबादला झाला असेल तर तुमचा मृत्यू संभाजीनगरमध्ये झाला पाहिजे.
औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करणाऱ्या एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची खिल्ली उडवत राज सिंह म्हणाले की, काही लोक म्हणतात की मी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुमचा जन्म औरंगाबादमध्ये झाला असला तरी तुम्हाला संभाजीनगरमध्ये मरावे लागेल. तुमचा मृत्यू हिंदु राष्ट्रात होईल.