India-Russia relations : ‘भारत-रशिया संबंध केवळ मोदींचे यश नाही’; काँग्रेसने नेहरूंपासून मनमोहन सिंहांपर्यंतचा इतिहास सांगितला
India-Russia relations : भारत-रशिया संबंधांवरून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नेहरूंपासून मनमोहन सिंहांपर्यंतच्या काळातील संबंधांचा इतिहास त्यांनी सांगितला.

India-Russia relations : राजधानीत सुरू असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान भारत-रशिया संबंधांवरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भारत आणि रशियातील मजबूत संबंधांची पायाभरणी 1950च्या दशकातच तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात झाली होती, असा दावा त्यांनी केला.
जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत भारताच्या विकासात तत्कालीन सोव्हिएत संघाच्या योगदानाचा उल्लेख केला. 1950च्या दशकापासून सोव्हिएत संघ हा भारताचा विश्वासू भागीदार राहिला आहे. देशातील सुरुवातीचे पोलाद कारखाने, अवजड अभियांत्रिकी, खाणकाम, ऊर्जा, तेल-गॅस, संरक्षण, अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्राच्या उभारणीत सोव्हिएत मदतीची महत्त्वाची भूमिका होती, असे त्यांनी म्हटले.
1955च्या नेहरूंच्या दौऱ्याचा दाखला –
रमेश यांनी 1955मधील भारत-सोव्हिएत संबंधांचा संदर्भ दिला. जुलै 1955मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी सोव्हिएत संघाचा 16 दिवसांचा दौरा केला होता. त्याच वर्षी सोव्हिएत नेते निकोलाई बुल्गानिन आणि निकिता ख्रुश्चेव यांनी भारताचा 20 दिवसांचा दौरा केला. या संबंधांना पुढे 9 ऑगस्ट 1971 रोजी झालेल्या ‘भारत-सोव्हिएत शांतता, मैत्री आणि सहकार्य करारा’मुळे आणखी बळ मिळाले.
‘इतिहासाचे श्रेय एकट्याने घेण्याचा प्रयत्न’ –
सोव्हिएत संघाचे 1991मध्ये विघटन झाल्यानंतरही भारत-रशिया संबंध कायम राहिले, असे रमेश यांनी सांगितले. 1998मध्ये तत्कालीन रशियन येवगेनी प्रमाकोव आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या काळात या संबंधांना नवे बळ मिळाले.
भारत-रशियातील संरक्षण सहकार्याचे उदाहरण देताना त्यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या संयुक्त प्रकल्पाचा उल्लेख केला. हा प्रकल्प अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात सुरू झाला आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात पुढे विस्तारला, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही रमेश यांनी केला. भारत-रशिया संबंध हे कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा सरकारचे योगदान नसून गेल्या सात दशकांतील सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मजबूत कूटनीतिक पायावर उभे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.





