प्रभात वृत्तसेवा इंदापूर – राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस उरले आहेत; मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता अद्याप जाहीर न झाल्याने इंदापूरच्या राजकारणात ‘थंडावा’ जाणवतो आहे. शहरातील राजकीय गल्लीबोळात नेहमीप्रमाणे चर्चा रंगल्या असल्या, तरी सध्या सर्वच पक्षांनी ‘वेट अँड वॉच’चा पवित्रा घेतला आहे.इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी स्थानिक गटांनी आणि प्रमुख नेत्यांनी तयारी सुरू केली असली, तरी अधिकृत निवडणूक कार्यक्रम न जाहीर झाल्याने, उमेदवारांची घोषणाच अडकल्यासारखी झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, तर जनतेत प्रतीक्षेचा सूर आहे. राजकीय पातळीवर सर्वच खेळाडू आपली ताकद तपासत आहेत; पण अजून कोणी उघड पत्ते टाकायला तयार नाही.राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी, प्रभाग रचना आणि आरक्षण यासारख्या प्रक्रिया पूर्णत्वास नेल्या आहेत. तरीही निवडणुकीची तारीख आणि आचारसंहिता याबाबत कोणताही अधिकृत निर्णय न झाल्याने, वातावरणात अनिश्चिततेचे सावट आहे. इंदापूरचे राजकारण ‘तोंड बघे’ अवस्थेत गेल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत कोणत्या आघाड्या तयार होणार आणि कोण कुणाबरोबर जाणार, याबाबत सर्वत्र कयास बांधले जात आहेत. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच भाजप नेते प्रवीण माने हे नेते, नेमके कोणत्या राजकीय पथकात उभे राहणार, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. या राजकीय ‘समिकरणा’ची सर्वांना उत्सुकता असून, हे नेते नेमके काय पुढे पाऊल टाकणार याकडे, शहरवासीयांच्या नजरा लागलेले आहेत.