Indapur News: लोकशाहीरांचे साहित्य म्हणजे सामाजिक परिवर्तनाची प्रेरणागाथा; नगराध्यक्ष भरत शहा यांचे प्रतिपादन
Indapur News: अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने समाजातील वंचित व कष्टकरी वर्गाला संघर्षाची चेतना दिली; इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने जयंती सोहळा संपन्न.

Indapur News – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून केवळ साहित्य समृद्ध केले नाही, तर अन्यायाविरुद्ध संघर्षाची चेतना जागवून स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना जनमानसात रुजविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या साहित्याने वैचारिक बळ दिले असून, आजही समाजातील वंचित, कष्टकरी आणि श्रमिक वर्गासाठी ते प्रेरणास्थान आहेत,
असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरपरिषद कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर साठेनगर येथील तसेच इंदापूर शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास नगराध्यक्ष भरत शहा व सर्व नगरसेवकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नगराध्यक्ष शहा म्हणाले, संविधानाने दिलेल्या समतेच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. सामाजिक सलोखा, शिक्षण, सांस्कृतिक जागरूकता आणि मानवी मूल्यांची जपणूक यासाठी त्यांचे कार्य प्रत्येक पिढीला दिशा देणारे आहे. नगरपरिषद अशा महान विभूतींचा वारसा जतन करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
यावेळी नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शकील सय्यद, विरोधी पक्षनेते अनिल पवार, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, भारत शिंदे, उमेश मखरे, शुभम पवार, अतुल शेटे, गणेश राऊत, सुधाकर ढगे, वशिम बागवान, प्रशांत उंबरे, अनिकेत वाघ, सागर आरगडे, अजिंक्य जावीर, नागनाथ शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रखर योद्धे होते. त्यांनी आपल्या शाहिरी, कादंबऱ्या, कथा आणि लोककलेच्या माध्यमातून उपेक्षित, शोषित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला. त्यांच्या विचारांचे जतन करणे आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचा वारसा पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
– भरत शहा, नगराध्यक्ष.





