IND W vs SA W Final : स्मृतीने फायनलमध्ये रचला नवा इतिहास! मितालीला मागे टाकत वर्ल्डकपमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी पहिलीच खेळाडू

Smriti Mandhana surpasses Mithali Raj most run in World Cup : आयसीसी महिला वनडे विश्व कप २०२५ चा अंतिम सामना नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटिल स्पोर्ट्स ॲकॅडमी येथे खेळला जात आहे. या निर्णायक सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलवार्ड्टने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताकडून सलामी देण्यासाठी आलेल्या स्मृती मानधनाने शफालीसह भारताला दमदार सुरुवात करुन दिली. त्याचबरोबर स्मृती मानधनाने खास विक्रम करत इतिहास रचला.
स्मृती मानधनाने मोडला मिताली राजचा विक्रम –
भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने मैदानात उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आपल्या खेळीतील २१वी धाव पूर्ण करताच तिने भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजचा एक मोठा विक्रम मोडला. ती आता एका वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी हा विक्रम मिताली राजच्या नावावर होता. या संपूर्ण विश्वचषकात स्मृती मानधनाचा फॉर्म अत्यंत शानदार राहिला आहे.
एका विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम –
स्मृती मानधना आयसीसी महिला वनडे विश्व कप २०२५ मध्ये आतापर्यंत ४०० हून अधिक धावा करण्यात यशस्वी झाली आहे. यासोबतच, ती एका वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजच्या नावावर होता, जिने २०१७ च्या महिला वनडे विश्वचषकात ४०९ धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने विश्वचषक २०२५ मध्ये ४३४ धावा केल्या आहेत. या विश्वचषकात स्मृती मानधनाने टीम इंडियासाठी सलामीला उतरून बहुतांश सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा – IND vs AUS : वॉशिंग्टन-अर्शदीपच्या जोरावर भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय! मालिकेत १-१ ने साधली बरोबरी
भारतीय महिला संघाकडून एका वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू:
- स्मृती मानधना – ४३४ धावा (२०२५)
- मिताली राज – ४०९ धावा (२०१७)
- पूनम राऊत – ३८१ धावा (२०१७)
- हरमनप्रीत कौर – ३५९ धावा (२०१७)
- स्मृती मानधना – ३२७ धावा (२०२२)
हेही वाचा – IND vs AUS : अभिषेक शर्माने मोडला सात वर्षांचा जुना विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
पावसाच्या व्यत्ययानंतर सामना सुरू; प्लेईंग-११ मध्ये बदल नाही –
पावसाच्या व्यत्ययामुळे आयसीसी महिला वनडे विश्व कप २०२५ चा अंतिम सामना सुमारे दोन तासांच्या विलंबाने* सुरू झाला. या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेईंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाच्या सलामीच्या जोडीने या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आहे.





