IND vs ENG Test Series, Virat Kohli And Mohammed Shami : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. आता दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. अलीकडेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मालिकेतील फक्त दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती.
शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. पण प्रश्न उपस्थित होत आहे की, विराट कोहली आणि मोहम्मद शमी शेवटच्या तीन कसोटीसाठी पुनरागमन करणार का? त्याच्या पुनरागमनावर सांशकता निर्माण झाली आहे. आज म्हणजेच 30 जानेवारीला शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.
विराट कोहली
बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीला भारतीय संघाचा भाग बनवले होते, मात्र मालिका सुरू होण्यापूर्वीच कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. मात्र, कोहलीने नाव का मागे घेतले याचा खुलासा झालेला नाही. कोहली सध्या सोशल मीडियावर सक्रिय दिसत नाही आणि बीसीसीआयनेही कोहलीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. अशा स्थितीत कोहली शेवटच्या तीन कसोटीत पुनरागमन करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता घरच्या मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी कोहली टीम इंडियात पुनरागमन करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मोहम्मद शमी
एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर मोहम्मद शमी टीम इंडियात परतला नाही. शमी दुखापतीमुळे बाहेर असून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले नाही. मात्र मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये शमी पुनरागमन करेल की नाही याबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.
2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, परंतु मालिका सुरू होण्यापूर्वी बोर्डाने कळवले होते की, दुखापतीमुळे शमी संपूर्ण कसोटी मालिकेत खेळणार नाही. आता भारतीय वेगवान गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटीत पुनरागमन करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.