मुबंई – रणजी करंडक स्पर्धेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना चेतेश्वर पुजाराने दमदार द्विशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याची भारताच्या कसोटी संघात निवड होण्याची शक्यता बळावली आहे.
आगामी काळात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून गेल्या काही महिन्यांपासून संघातून बाहेर असेलला पुजारा या मालिकेद्वारे संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. आता निवड समिती त्याच्याबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
झारखंडविरुद्धच्या रणजी सामन्यात पुजाराने ३१७ चेंडूंचा सामना करताना द्विशतक फटकावले. त्याने या डावात ३५६ चेंडूंचा सामना करताना एकूण २४३ धावांची खेळी केली व त्यात ३० चौकार फटकावले आहेत. गेल्या दोन मोसमांपासून पुजाराकडून धावा होत नव्हत्या. त्यामुळे त्याचे भारताच्या कसोटी संघातील स्थानही गेले होते.
इतकेच नव्हे तर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून मायदेशी परतला. या मालिकेसाठीही पुजाराची संघ निवडीदरम्यान चर्चा झाली नव्हती. मात्र, या मालिकेत भारताच्या नवोदित खेळाडूंची प्रभावी कामगिरी केली नसल्याने निवड समिती घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी पुजाराच्या नावाचा विचार निश्चितच करेल असे चित्र सध्यातरी दिसत आहे.