IND Vs ENG Ranchi Test, Team india playing 11 : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला रांचीमध्ये इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळायचा होता. मात्र टीम मॅनेजमेंटने जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah ) वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध पाचही कसोटी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भारताचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे पाचही कसोटी सामने खेळणार नाहीत, असा निर्णय संघ व्यवस्थापनाने आधीच घेतला होता. या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावरील वर्कलोड मॅनेज करण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) चौथ्या कसोटी सामन्याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. बीसीसीआयने सांगितले आहे की, “जसप्रीत बुमराहला मालिकेचा दीर्घ कालावधी लक्षात घेऊन आणि वर्क लोड पाहता विश्रांती देण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना संपल्यानंतरच संघातून मुक्त (रिलीज)करण्यात आले होते. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बुमराह संघाचा भाग नसल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वी मोहम्मद सिराजला पहिल्या कसोटीनंतर मुक्त (रिलीज) करण्यात आले होते. सिराजने इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळली नाही आणि तिसऱ्या कसोटीत पुनरागमन केले. आता मोहम्मद सिराजला मालिकेतील शेवटच्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, बुमराहला विश्रांती देणे हा संघ व्यवस्थापनासाठी सोपा निर्णय नाही आहे. कारण या मालिकेत जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या 17 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
IND vs ENG 4th Test : चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेइंग-11ची केली घोषणा, संघात दोन मोठे बदल…
बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही…
विश्वचषकापूर्वी प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीची बीसीसीआयला सर्वात मोठी भीती आहे. केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतही टीम इंडियाचा भाग नव्हता. श्रेयस अय्यरला पाठीचा त्रास असल्याची माहितीही समोर आली आहे. अशा परिस्थितीत बुमराह याच्या बाबतीत धोका न पत्करता संघ व्यवस्थापनाने मुकेश कुमारला परत बोलावण्याचा निर्णय घेतला.