IND vs ENG : ‘त्यांना काही बोलू नका…’, भारताच्या विजयानंतर योगराज सिंगने गंभीरच्या टीकाकारांना खडसावलं

IND vs ENG Yograj Singh on Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाने नुकताच इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयात शुबमन गिल, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत आणि आकाश दीप यांसारख्या खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक व्हायलाच हवे. परंतु, याचवेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला काही टीकांना सामोरे जावे लागले आहे. आता योगराज सिंग यांनी गंभीरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
गेल्या हंगामापासून संघाच्या कसोटी कामगिरीसाठी त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. जेव्हा भारताने कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली, तेव्हा गौतम गंभीरवर खूप टीका झाली. परंतु प्रशिक्षकाने आपल्या निर्णयावर ठाम विश्वास ठेवला. पाच दिवसांनंतर भारताने विजय मिळवला आणि गंभीरचे निर्णय योग्य ठरले.
योगराज सिंग यांनी दिला पाठिंबा –
मालिकेच्या सुरुवातीला, इंग्लंडमधील खराब फलंदाजीच्या रेकॉर्ड असूनही, गंभीरने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठीच्या १० दिवसांच्या कसोटी क्रिकेटमध्ये बहुतांश बाबतीत योग्य निर्णय घेतले. लीड्समधील पराभवानंतर भारताच्या शानदार पुनरागमनाचे श्रेय अनेकांनी गौतम गंभीरला दिले नाही. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी मुख्य प्रशिक्षकाची प्रशंसा केली. योगराज यांनी आपला मुलगा युवराज सिंग याच्यासोबत गंभीरचे कौतुक करताना सांगितले की, अशा व्यक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये.
हेही वाचा – Shubman Gill : शुबमन गिल-सारा तेंडुलकर पुन्हा एकत्र? व्हायरल फोटोने चर्चांना उधाण
योगराज सिंग काय म्हणाले?
एएनआयशी बोलताना योगराज सिंग यांनी म्हणाले, “भारतीय खेळाडू सातत्याने प्रगती करत आहेत आणि त्यांच्या खेळात सुधारणा करत आहेत. आम्ही नेहमीच त्यांना पाठिंबा देऊ. गौतम गंभीरबद्दल काही बोलू नका. ते चांगले काम करत आहेत. गंभीर, युवराज आणि द्रविड क्रिकेटला परत देत आहेत. कारण त्यांनी खूप काही प्राप्त केले आहे. आपली टीम मालिका हरली तरी त्यांना निराश करू नये. जर तुम्ही हरलात, तर तुम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागेल; जर तुम्ही जिंकलात, तर स्पष्टीकरणाची गरज नाही. आम्हाला आशा आहे की शुबमन गिलच्या कर्णधारपदाखाली आम्ही मालिका जिंकू.”





