IND vs BAN 2nd Test : 2-0 ने मालिका विजय निश्चित? कानपूरमध्ये भारताचं रेकॉर्ड पाहता सामन्यापूर्वीच बांगलादेशच्या संघाचं खचणार मनोबल….

India vs Bangladesh 2nd Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना कानपूर येथे होणार आहे. दोन्ही संघ 27 सप्टेंबरपासून ग्रीन पार्क स्टेडियमवर आमने-सामने येतील. टीम इंडिया 2021 नंतर प्रथमच या मैदानावर खेळणार आहे. गेल्या वेळी येथे न्यूझीलंडशी लढत झाली होती. तो सामना अनिर्णित राहिला होता. आता बांगलादेशविरुद्ध येथे विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष असेल. असे झाल्यास रोहित शर्माचा संघ बांगलादेशविरूध्दची मालिका 2-0 ने जिंकेल.
41 वर्षात पराभव नाही…
भारतीय संघानं 41 वर्षांपासून कानपूरमध्ये एकही कसोटी सामना गमावलेला नाही. या मैदानावर 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा शेवटचा पराभव झाला होता. तेव्हापासून टीम इंडिया येथे अजिंक्य आहे. हा रेकॉर्ड बांगलादेशसाठी चांगला नाही. पहिल्या सामन्यातील पराभवाने त्रस्त झालेला पाहुणा संघ हा रेकॉर्ड पाहून घाबरून जाईल. या मैदानावर त्यांचा संघ प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सामना करणार आहे.
गेल्या 8 वर्षांपासून कानपूरमध्ये विजय नाही…
भारतीय संघ 8 वर्षांपासून कानपूरमध्ये जिंकलेला नाही. या मैदानावर त्याचा शेवटचा विजय 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झाला होता. त्यानंतर 2021 मध्ये त्याच संघाविरुद्ध सामना झाला होता तेव्हा तो सामना अनिर्णित स्थितीत संपला होता.
कानपूरमध्ये भारताचं रेकॉर्ड….
भारताने 1952 पासून कानपूरमध्ये एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 7 सामने जिंकले आहेत तर 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथे 13 सामने अनिर्णित राहिले आहेत.
पहिल्या कसोटीत धमाकेदार विजय…
दरम्यान, चेन्नई कसोटीत भारताने 280 धावांनी मोठा विजय मिळवला होता. रविचंद्रन अश्विनच्या करिष्माई कामगिरीसह, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या दमदार खेळाने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या सामन्यात शतक झळकावण्यासोबतच अश्विनने एकूण 8 विकेट्सही घेतल्या होत्या. त्याचवेळी जडेजाने पहिल्या डावात 86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. बुमराहने एकूण 5 विकेट घेतल्या. शुभमन आणि पंत यांनी शतकी खेळी खेळली होती.





