Aakash Chopra on Sanju Samson : भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून सातत्याने वगळण्याच्या टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. सॅमसनच्या फलंदाजीच्या क्रमातील सततचे बदल आणि त्याला संघातून बाहेर ठेवण्याच्या धोरणाबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. सॅमसनच्या जागी संघाने जितेश शर्मावर विश्वास दाखवला आहे, ज्याने होबार्ट येथील सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सॅमसनबद्दल काय निर्णय घेतला आहे? शुबमन गिल टी-२० संघात परतल्यामुळे संजू सॅमसनला सलामीची जागा सोडावी लागली. यानंतर त्याने काही सामन्यांमध्ये खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि आता त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमधूनच वगळण्यात आले आहे. आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले .ते म्हणाले “सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, आम्ही संजू सॅमसनबद्दल काय निर्णय घेतला आहे? संजू का खेळत नाहीये, हा मोठा प्रश्न आहे आणि आम्ही असे का करत आहोत? आम्ही संजूला संधी दिली आणि त्याने चांगले प्रदर्शन केले. खूप शानदार केले, असे मी म्हणणार नाही, पण ठीक होते. तुम्ही त्याला ओमानविरुद्ध वरच्या क्रमांकावर खेळवले आणि त्याने अर्धशतकही झळकावले.” हा कोणता न्याय आहे? टी-२० वर्ल्ड कपनंतर संजू सॅमसन टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तो अभिषेक शर्मासोबत सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करत होता. सॅमसनच्या नावावर गेल्या कॅलेंडर वर्षात तीन शतके करण्याचा विक्रमही आहे. मात्र, आशिया चषकात गिलच्या पुनरागमनानंतर सॅमसनला खालच्या क्रमावर ढकलण्यात आले. चोप्रा पुढे म्हणाले, “आशिया चषकाच्या फायनलमध्ये त्याला खेळवले, त्याने काही धावा केल्या. जेव्हा आम्ही म्हणत होतो की संजू सॅमसनला टॉप ऑर्डरमध्ये खेळवावे, तेव्हा तुम्ही त्याला खालच्या क्रमावर खेळवत होता… आणि आता तो एका सामन्यात अपयशी ठरताच, तुम्ही त्याला थेट संघातून बाहेर काढले! हा कोणता न्याय आहे?” हेही वाचा – IND vs AUS : शिवम दुबेचा कहर! झाम्पाला ठोकला गगनचुंबी षटकार, चेंडू पोहोचला थेट स्टेडियमबाहेर, पाहा VIDEO चोप्रांनी आपली निराशा व्यक्त करताना म्हटले की, “तुम्ही त्याला खेळवले, संघाने आशिया कप जिंकला आणि आम्ही त्याचे कौतुक केले. त्यानंतर कॅनबेरामध्ये त्याची फलंदाजी आली नाही. ठीक आहे सर, काही हरकत नाही. मेलबर्नमध्ये तुम्ही त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. सगळेजण आश्चर्यचकित झाले, पण आम्ही ‘ठीक आहे सर’ म्हटले. पण आता त्याला ड्रॉप केले आहे. आता मला पुन्हा ‘ओके सर’ म्हणावे की नाही, हे समजत नाहीये, कारण आम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहोत, हे माझ्या आकलनशक्तीच्या बाहेर आहे,”