रोम : इटलीची राजधानी रोम येथे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या हस्ते भारतीय दूतावासाच्या नवीन चॅन्सरीचे उद्घाटन करण्यात आले आहे. भारत आणि इटलीमधील ऐतिहासिक संबंधांचा हवाला जयशंकर यांनी यावेळी दिला. दोन्ही देशांनी जगाला वेगळा दृष्टीकोन दिल्याचेही ते म्हणाले. भारत आणि इटलीचा संपुर्ण भूमध्य आणि युरोपवर प्रभाव राहिलेला आहे. युरोपातील प्रमुख भागीदार म्हणून इटलीबरोबरच्या संबंधांचा भारताला नेहमीच आदर राहिलेला आहे, असे जयशंकर यांनी यावेळी सांगितले. जी-७ गटाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जयशंकर इटलीमध्ये आले आहेत. बैठकीसाठी भारताला अतिथी सदस्य म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. भेटीदरम्यान, ते रोममधील भूमध्य संवादाच्या १० व्या सत्रात देखील सहभागी होणार आहेत. इटलीचे परराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालय आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटीकल स्टडीजच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.