Pune Gramin News | शहरातील प्रमुख मार्गांसह राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), भारतीय राजमार्ग प्राधिकरण, (एनएचएआय) आणि महानगरपालिका यांच्या वतीने विशेष मोहिम राबवित अतिक्रमण हटवली जात आहेत. या कारवाईच्या दुसऱ्या टप्प्याला १७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या कारवाईत पुणे सातारा महामार्ग आणि पुणे पंढरपूर महामार्गांवरील अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू आहे. ३० मार्चपर्यंत ही कारवाई मोहिम राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढला जाणार असल्याचा दावा पीएमआरडीएकडून करण्यात येत आहे. पुणे सातारा राज्य महामार्गलत असणाऱ्या अतिक्रमणावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. महामार्गालतच्या नवले पूल ते सारोळा दरम्यानची अतिक्रमणे हटवण्यात येत आहे. सातारा-पुणे महार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहने जात-येत असतात. या रस्त्यालगतच्या नवले पूल ते साराळा दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते. याचा या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ येते. निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अतिक्रमांवर धडक कारवाई करत अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत सव्वाचार हजार अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांनी धडक कारवाई करत अतिक्रमणे हटवली आहेत. त्यामुळे आता महामार्गावरील वाहतुकीचा वेगही वाढला जाणार आहे. या भागातील अतिक्रमणे हटवली जात आहेत. नवले पूल, सारोळे, सूस रस्ता, हडपसर (शेवाळवाडी), दिवे घाट, नवलाख उंब्रे-चाकण, हिंजवडी-माण, शिक्रापूर या मार्गांवरील अतिक्रमणांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.