Satara: कार्यकर्त्यांना हात लावाल तर जशास तसे उत्तर देऊ… ना. शिवेंद्रसिंहराजे
Satara जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावांवरून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना इशारा दिला.

Satara: कार्यकर्त्यांना हात लावाल तर जशास तसे उत्तर देऊ. संघर्ष कोणाला चुकलेला नाही. आम्हीही संघर्षातूनच वर आलो आहोत. कार्यकर्त्यांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावांवरून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना इशारा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर प्रवेशद्वारावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीतील राजकीय परिस्थिती, पुनर्वसनाचे प्रश्न, पर्यटन विकास, पालकमंत्रिपद आणि आगामी जिल्हा बँक निवडणुकीबाबत भूमिका मांडली.
जावळी तालुक्यातील प्रत्येक गावाने लोकशाही पद्धतीने आपापल्या विकास सेवा सोसायट्यांचे ठराव पाठवावेत, असे ठरले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात आपण सुरुवातीपासून हस्तक्षेप केला नाही, असे स्पष्ट करताना शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले म्हणाले, ‘‘बर्याच गावांचे प्रस्ताव चर्चेअंती पाठवण्यात आले आहेत. मात्र, आखाडे येथील ठरावाच्या संदर्भाने निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामध्ये आम्ही कार्यकर्त्यांच्या हितासाठी भूमिका घेतली. आखाडे येथील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी व धक्काबुक्की झाल्याचे कानावर आल्यानंतर आपण जातीने जाऊन कार्यकर्त्यांची चौकशी केली, जावळी तालुक्यातील दहशत खपवून घेतली जाणार नाही.’’ आम्हीही संघर्षातून वर आलो आहोत. राजकारण आम्हाला वारसाहक्काने सहज मिळालेले नाही. त्यामुळे कोणी दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची आमची क्षमता आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.





