मनमोहन सिंग यांच्याऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान केले असते तर कॉंग्रेसची दुर्दशा झाली नसती – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

इंदौर – मनमोहन सिंग यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान केले असते तर कॉंग्रेसची आज जी दुर्दशा झाली आहे, तेवढी दुर्दशा झाली नसती, असे मत केंद्रीय मंत्री, खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
इंदौर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रामदास आठवले म्हणाले, 2004 लोकसभा निवडणुकीत यूपीएला बहुमत मिळाले होते. त्यावेळी मी दोन पर्याय सूचवले होते. एक म्हणजे सोनिया गांधी यांना पंतप्रधान करावे, नाही तर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करावे. पवार हे जनाधार असलेले लोकप्रिय नेते आहेत. ते पंतप्रधानपदासाठी योग्य होते. पवारांना पंतप्रधान करावे म्हणून आपण सोनया गांधींकडे आग्रहही धरला होता. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तसेच पवारांना पंतप्रधान केले असते तर कॉंग्रेसची अशी दुर्दशा झाली नसती, असा दावाही त्यांनी केला.
त्यावेळी मी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावे, असा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी त्यांच्या विदेशीत्वाचा मुद्दाही राहिलेला नव्हता. पण माझं ऐकलं नाही. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा होऊ शकतात तर सोनिया गांधी का भारताच्या पंतप्रधान होऊ शकत नाही? असा सवाल करतानाच सोनिया गांधी या राजीव गांधी यांच्या पत्नी आहेत. लोकसभेच्या सदस्या आहेत. मग त्या पंतप्रधान का होऊ शकत नाही? असे ते म्हणाले.





