मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. पण भाजपने घाणेरडे राजकारण सुरूच ठेवले आहे. भाजपच्या 105 आमदारांमध्ये कित्येक जण आमच्यापैकी त्यांच्यात गेलेले आहेत. ते कधीही आमच्याकडे येतील. आमच्या संपर्कात कोण आहे, हे तुम्हाला कळलं तर फार मोठा भूकंप होईल, असा खळबळजनक दावा महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भाजपने घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांना एवढी मोठी सत्ता मिळाली. तरी त्यांचा हाव आता राज्यामध्ये आहे. राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मला सातत्याने काही लोक विचारतात की महाराष्ट्रात नेमकं काय होणार? महाराष्ट्र सरकार स्थिर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राने नवा फॉर्म्युला देशासमोर ठेवला आहे. हा फॉर्म्युला खूप चांगला आहे. याशिवाय हा फॉर्म्युला दीर्घकाळ राहील. कुणी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कुणी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चांगलंच बदडू. आम्ही गांधीवादी आहोत. पण भाजपची दादागिरी किती दिवस सहन करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आम्ही तुकाराम महाराजांची शिकवण शिकलेलो आहोत. नाठाळांच्या डोक्यावर काठी कशी मारायची हे आम्हालाही कळतं. तुमची गाठ आमच्याशी आणि यशोमती ठाकूरशी आहे, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.