Devendra Fadnavis : “२०२९ पर्यंत मीच मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार” – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis – राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर २०२९ पर्यंत मी कायम राहणार असून, सत्ताधारी आघाडीत कोणताही बदल होणार नाही. माझे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरतेच आहे, दिल्ली अजून दूर आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील एक-दोन वर्षांत फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा होत्या त्यावर पडदा पडला आहे.
मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. फडणवीस म्हणाले, महायुतीत कोणतेही फेरबदल होणार नाही, नवे भागीदार येणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका मुंबईमध्ये एकत्र आणि इतर ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवण्यात येणार आहेत असेही फडणवीसांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, सत्तेत असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृ्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही. कोणताही नवा भागीदार येणार नाही तसेच विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही.
तसेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कोणताही विचार नाही. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या असून त्या निवडणुकांकडे आमचे लक्ष आहे. त्यामुळे विस्तार होईल किंवा सध्याच्या मंत्र्यांना हटवण्याबाबत कोणता विचार अथवा तशी परिस्थिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगर क्षेत्रात काही ठिकाणी आम्ही वेगवेगळे, तर काही ठिकाणी युती करून लढणार आहोत.
त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीत आमचे महायुतीमधील तीन्ही पक्ष एकत्र लढतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, पुणे, पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का, याची चाचपणी करण्यात येईल. जिथे विरोधकांना फायदा असेल, त्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवू व त्यांचा सामना करू, असेही ते म्हणाले.
विरोधकांकडून मतदारयांद्यावरुन करण्यात येत असलेल्या आरोपांवर ते म्हणाले, विरोधकांनी निवडणूक यादींबाबत कोणताही ठोस आक्षेप अथवा सूचना दिलेल्या नाहीत. केवळ निवडणुका उशिरा व्हाव्यात हा त्यांचा उद्देश आहे, असा टोला त्यांनी लगाविला.





