Vaibhav Suryavanshi Rection on Sledging : भारतीय अंडर-१९ संघाने सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. यूएईविरुद्धचा पहिला सामना भारताने तब्बल २३४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत जोरदार विजयी सलामी दिली. या विजयात सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीने सर्वाधिक लक्ष वेधले. वैभवने या सामन्यात १७१ धावांची अविस्मरणीय खेळी करत सर्वांची मने जिंकली. या शतकी खेळीदरम्यान त्याने १४ उत्तुंग षटकार आणि ९ चौकार मारले. विशेष म्हणजे, यूएईच्या खेळाडूंकडून त्याला वारंवार स्लेजिंगचा सामना करावा लागला, पण त्याचे लक्ष जराही विचलित झाले नाही आणि त्याने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. या शानदार कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा सर्वांचे मन जिंकले. ‘मी बिहारचा आहे, मला फरक पडत नाही’ सामन्यानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार स्वीकारताना वैभव सूर्यवंशीला स्लेजिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने अत्यंत आत्मविश्वासाने आणि स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. तो म्हणाला, “सर, मी बिहारमधून येतो, त्यामुळे मागून कोणी काहीही बोलले तरी मला कोणताही फरक पडत नाही. यष्टिरक्षकाचे कामच बोलत राहणे असते, पण माझे पूर्ण लक्ष माझ्या फलंदाजीवर होते.” वैभवसाठी २०२५ हे वर्ष खूपच यशस्वी ठरले आहे. त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, तर यापूर्वी इमर्जिंग आशिया कपमध्येही त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि आपल्या फलंदाजीने प्रभावित केले होते. हेही वाचा – IND U19 vs UAE U19 : वैभव सूर्यवंशीच्या शतकाने उडवला यूएईचा धुव्वा! टीम इंडियाची २३४ धावांनी विजयी सलामी आता पाकिस्तानच्या आव्हानाचा सामना – आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-१९ संघ या स्पर्धेत खेळत आहे. ‘ग्रुप-ए’ मध्ये शानदार सुरुवात करत भारताने महत्त्वाचे २ गुण मिळवले आहेत.आता भारतीय संघाला स्पर्धेतला आपला पुढचा आणि महत्त्वाचा सामना १४ डिसेंबर रोजी पाकिस्तान अंडर-१९ संघाविरुद्ध खेळायचा आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर खिळलेल्या असतील. पाकिस्तान संघानेही पहिल्या सामन्यात मलेशियाला २९७ धावांनी हरवून जोरदार सुरुवात केली आहे.