Pune District : आंबळेच्या ऋषिकेश बेंद्रेंची MPSC परीक्षेत बाजी; उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षकपदासाठी निवड
Pune District : ऋषिकेश यांचे प्राथमिक शिक्षण आंबळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर न्हावरे येथील श्री. मल्लिकार्जुन विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

न्हावरे : परिस्थिती कोणतीही असो, ध्येय निश्चित असेल आणि त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल तर यश दूर नाही, हे आंबळे (ता. शिरुर) येथील ऋषिकेश बाळासाहेब बेंद्रे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. कोणतीही खाजगी शिकवणी न लावता, केवळ स्व-अभ्यास, नियोजन, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत ४०० पैकी ३१० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, ऋषिकेश यांची उद्योग निरीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) या दोन्ही पदांसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या दुहेरी यशाने आंबळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा यशाचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.
ऋषिकेश यांचे प्राथमिक शिक्षण आंबळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर न्हावरे येथील श्री. मल्लिकार्जुन विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिरुर येथून उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुणे गाठले. गुणवत्तेच्या जोरावर पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. चार वर्षांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी इंजिनिअरची पदवी संपादन केली.
अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर त्यांच्यासमोर चांगल्या पगाराची नोकरी करण्याची संधी होती. मात्र, नोकरीच्या आकर्षक पॅकेजपेक्षा प्रशासकीय सेवेत जाऊन सर्वसामान्यांची सेवा करण्याचे स्वप्न त्यांनी मोठे मानले. अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित करून त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.
पहिल्या अपयशाने खचले नाहीत…
स्पर्धा परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात ऋषिकेश यांना अपयश आले. मात्र, त्यांनी या अपयशाकडे पराभव म्हणून न पाहता स्वतःच्या चुका शोधण्याची संधी म्हणून पाहिले. त्यानंतर अभ्यासाचे नियोजन अधिक काटेकोर केले. सन २०२१ पासून पुण्यात तसेच वेळोवेळी गावाकडे राहून त्यांनी सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. दररोज तब्बल १६ तास स्व-अभ्यास करत त्यांनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवले.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात त्यांनी कोणत्याही खाजगी क्लासचा आधार घेतला नाही. अभ्यासक्रम समजून घेणे, योग्य संदर्भ साहित्य निवडणे, सातत्याने प्रश्नांचा सराव करणे आणि स्वतःच्या चुका सुधारत जाणे, या पद्धतीने त्यांनी तयारी केली. अखेर त्यांच्या अथक परिश्रमांना यशाची साथ मिळाली आणि २०२५ मध्ये झालेल्या MPSC परीक्षेत त्यांनी राज्यात अव्वल स्थान पटकावले.
गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक…
ऋषिकेश यांच्या यशाची माहिती मिळताच आंबळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांची भव्य मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात आला. गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिक्षकांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपल्या यशाचे श्रेय ऋषिकेश यांनी वडील बाळासाहेब बेंद्रे, आई माया बेंद्रे तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक यांना दिले आहे. आई-वडिलांचा विश्वास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यामुळे हे यश मिळवता आल्याचे त्यांनी सांगितले.
“रिल्स पाहून नव्हे, ध्येय निश्चित करुन स्पर्धा परीक्षेत या”
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना ऋषिकेश बेंद्रे म्हणाले, “कोरोनानंतर स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धाही प्रचंड वाढली आहे. मात्र, केवळ रिल्स किंवा बातम्या पाहून अथवा आई-वडिलांच्या आग्रहाखातर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येऊ नये.
प्रथम पदवीचे शिक्षण पूर्ण करावे आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा गांभीर्याने विचार करावा. आपल्याला अधिकारी व्हायचे आहे, हे ध्येय निश्चित झाल्यानंतर अभ्यासाचे योग्य नियोजन करावे. जिद्द, चिकाटी, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या जोरावर निश्चितपणे यश मिळवता येते,” असा विश्वास ऋषिकेश बेंद्रे यांनी व्यक्त केला.
ऋषिकेश बेंद्रे यांचा हा प्रवास केवळ एका परीक्षेतील यशाची कहाणी नाही, तर ‘क्लास नाही, तर अभ्यास हवा; परिस्थिती नाही, तर जिद्द हवी’ असा संदेश देणारा आहे. ग्रामीण भागातून येऊन, खाजगी शिकवणीचा आधार न घेता आणि अपयशानंतरही सातत्य न सोडता राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ऋषिकेश यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





