Satej Patil । Praniti Shinde। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. यामुळे राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे. बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी बैठकांचे आयोजन करून निवडणुकीची रणनिती ठरवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी अनेक आव्हानांना सामोरी जाणारी असणार आहे. दुसरीकडे महायुतीसाठी देखील ही निवडणूक अस्तित्व सिद्ध करणारी असणारी आहे. महाविकास आघाडीमधील मोठा भाऊ अर्थात काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीसाठी व्यूव्हरचना आखण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाची एक अत्यंत महत्वाची बैठक शनिवारी २७ सप्टेंबर रोजी काँग्रेस भवनात पार पडली. या बैठकीत अनेक नेत्यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी या निवडणुका जिंकण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षाचे इतर काही नेतेही उपस्थित होते. सतेज पाटील काय म्हणाले? या बैठकीत सतेज पाटील यांनी मार्गदर्शन करताना राहुल गांधी यांनी मतचोरीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खिडकी उघडली आहे, आता आपल्याला निवडणुकीचे जोरदार तयारी करून दार उघडायचे असल्याचे नमूद केले. तीन महिन्यांचा कालावधी असणार असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले. या काळाता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच काही दिवसांमध्ये होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी कंबर कसावी लागणार आहेत. त्या दृष्टीने पदवीधर नोंदणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार प्रणिती शिंदे काय म्हणाल्या? लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकसंघ काम केल्याने यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत सगळ्यांच्या अति आत्मविश्वास व तिकीट वाटपातील गोंधळ यामुळे नुकसान झाले. हा गोंधळ जाणून बुजून निर्माण केला गेला असल्याची खंत प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतभेद टाळून व मतविभाजन टाळून चांगले यश संपादित करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हेही वाचा : Pimpri News : १४ व्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा दुर्देवी मृत्यू ; ठेकेदारावर गुन्हा दाखल