Muralidhar Mohol | माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून चार्टेट विमानाने बँकोकला निघाला होता. सुरुवातीला म्हणजेच बँकोकला जाण्यापूर्वी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज याचे अपहरण झाल्याची माहिती माध्यामांमध्ये आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, ऋषिराज याचे अपहरण झाले नव्हते तर तो त्याच्या मित्रासोबत चार्टेट विमानाने बँकोकला निघाला होता. मात्र, तानाजी सावंत यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन केला आणि ज्या विमानात ऋषिराज देशाबाहेर जात होता ते विमान परत पुणे विमानतळावर फिरवण्यात आले. यानंतर मोहोळ यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता स्वतः मोहोळ यांनी याबाबतची इनसाइड स्टोरी सांगितली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? याबाबत खुलासा केला आहे. मी जे केलं ते कायद्याच्या चौकटीत केलं. मी म्हटलं पुणे पोलिसांकडे जा. पुणे पोलिस आमच्या मंत्रालयात मेल करतील. त्यामुळे त्यांनी तसं केलं. शेवटी मी एका पदावर काम करत असलो तरी माझ्या पदाचा सत्तेचा गैरवापर मी कदापी करणार नाही, असे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. मुलगा संकटात आहे. तो विमानतळावर गेलाय हे त्यांनी (तानाजी सावंत) मला सांगितले. तेव्हा त्यांना माहीत नव्हते तो कुठे चाललाय. त्याच्यासोबत जी दोन लोकं आहेत ती कदाचित चांगली नाहीत, असं कोणीही येऊन सांगितलं तर मला मदत केली पाहिजे. अशावेळी मंत्री आहे की आमदार आहे, हे नाही पाहिले जात. तिथे समोरच्या माणसाला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. …त्यानंतर विमान परत फिरले मोहोळ म्हणाले, पुणे पोलिसांनी आधी आमच्या मंत्रालयात मेल केला मगी आम्ही एटीसीच्या माध्यमातून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पायलटला सूचना दिल्या की तुम्ही देशाच्या बाहेर जायचे नाही तुम्ही परत फिरा. पायलटपर्यंत मेसेज जात नव्हता मग दुसऱ्या विमानाच्या माध्यमातून त्यांना मेसेज दिला गेला. त्यानंतर विमान परत फिरले. अडचणीत असलेला माणूस कोण आहे? काय आहे? हे न पाहता त्याला मदतीची गरज आहे हे मी पाहिलं पाहिजे.