Ravi Shastri : ‘विराटचे मन पूर्णपणे साफ होते, पण…’, कोहलीच्या निवृत्तीबद्दल रवी शास्त्रींचा मोठा खुलासा

Virat Kohli’s Test Retirement Shocks Ravi Shastri : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा सुरूच आहे. दरम्यान, माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाने त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना वाटते की विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही २-३ वर्षे योगदान देऊ शकला असता. पण तो सततच्या सार्वजनिक टीका-टिप्पणीमुळे मानसिकदृष्ट्या थकला होता, असा खुलासा रवी शास्त्रींनी केला आहे.
रवी शास्त्रींचा विराटच्या निवृत्तीबद्दल खुलासा –
रवी शास्त्री यांनी सांगितले की, निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी विराट कोहलीने त्यांच्याशी चर्चा केली होती. निवृत्तीपूर्वी कोहलीने जे सांगितले ते रवी शास्त्रींनी आयसीसी रिव्ह्यूमध्ये सांगितले. कोहलीने शास्त्रींना सांगितले होते की त्याने संघाला सर्वस्व दिले आहे आणि त्याला कोणताही पश्चात्ताप नाही. निवृत्तीच्या एक आठवडा आधी विराट कोहलीने रवी शास्त्रींना हे सांगितले होते.
कोहलीचे मन पूर्णपणे साफ होते – रवी शास्त्री
आयसीसी रिव्ह्यूमध्ये संजना गणेशनशी झालेल्या संभाषणात रवी शास्त्री म्हणाले, ‘कोहलीचे मन पूर्णपणे साफ होते. निवृत्तीच्या निर्णयाबद्दल त्याच्या मनात कोणतीही शंका नाही, असे कोहलीने स्पष्टपणे सांगितले. कोहलीचे मन त्याला सांगत होते की, आता पुरे झाले.’ रवी शास्त्री यांनीही कबूल केले की त्यांना कोहलीच्या निर्णयाने आश्चर्य वाटले. शास्त्री म्हणाले, ‘मला वाटले होते की, कोहली आणखी दोन-तीन वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकेल, पण जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या थकता तेव्हा तुमचे शरीरही हार मानते. तुम्ही शारीरिकदृष्ट्या कितीही तंदुरुस्त असलात तरी, जर तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले असाल तर ते तुमच्या शरीराला संदेश देते की आता पुरे झाले.’
हेही वाचा – Tim David : टिम डेव्हिडच्या पावसाच्या पाण्यातील घसरगुंडीने वेधलं लक्ष, VIDEO होतोय व्हायरल
रवी शास्त्री पुढे म्हणाले की कोहलीची लोकप्रियता देखील त्याच्या थकव्याचे कारण होती. कोहलीला जगभरातून आदर मिळाला आहे. गेल्या दशकात त्याच्याइतके चाहते कोणाकडेही नव्हते. ऑस्ट्रेलिया असो वा दक्षिण आफ्रिका, लोक त्याला भेटायला यायचे. लोकांचे त्याच्याशी प्रेम आणि द्वेषाचे नाते होते. प्रेक्षकांना भडकवण्याची क्षमता त्याच्यात होती, त्यामुळे लोक त्याच्यावर रागावयाचे. तो ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करत होता त्यावरून त्याची तीव्रता दिसून येत होती.





