मुंबई – मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवावे, अशीही मागणी केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन ट्वीट करून कोश्यारी यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच, मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचाच मोठा वाटा आहे, असं ठणकावून सांगितले.
“महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपालांनी तत्काळ जाहीर माफी मागावी”
अजित पवार म्हणाले, “मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. ।। महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे… खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा ।।”, असे ट्वीट करत अजितदादांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.