मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मुंबई विषयीच्या वादग्रस्त वक्तव्याने मोठेच राजकीय वादंग माजले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना असे वक्तव्य केले आहे की गुजराती आणि राजस्थानींना मुंबईतून काढून टाकल्यास मुंबईचे सध्याचे देशाची आर्थिक राजधानी हे जे स्वरूप आहे ते नाहीसे होईल. गुजरातील आणि राजस्थानी माणसांमुळेच मुंबईला आर्थिक राजधानीचे स्वरूप आले असे त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता. त्यांच्या या विधानावर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
आपल्या वक्तव्याला विरोध झालेला पहाताच राज्यपालांनी त्या विषयी सारवासारवही केली आहे. त्यांनी म्हटले आहे की एखाद्या समाजाच्या योगदानाचे कौतुक करणे म्हणजे येथील स्थानिक लोकांचा अवमान केल्यासारखे होत नाही. माझ्याकडून महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अवमान होईल असे वक्तव्य माझ्याकडून कधीच होणार नाही असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे.
राज्यपालांनी म्हटले आहे की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की कोणाच्याही कष्टाला कमी लेखण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीत आणि विकासात मराठी भाषिकांचा हात आहे.” अंधेरीतील एका चौकाच्या (चौका) नामकरण समारंभात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त उद्गार काढले होते. राज्यपालांनी म्हटले होते की मी इथल्या लोकांना सांगतो की जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले तर तुमच्याकडे पैसा राहणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही. राजभवनाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोश्यारी यांनी मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-मारवाडी आणि गुजराती समुदायांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. राजस्थानी-मारवाडी समुदाय देशाच्या विविध भागात तसेच नेपाळ आणि मॉरिशस सारख्या देशांमध्ये राहत आहे. या समुदायाचे सदस्य कुठेही जातात, ते केवळ व्यवसायच करत नाहीत, तर शाळा, रुग्णालये तयार करून लोकोपयोगी कार्येही करतात,” ते म्हणाले.
महाराष्ट्रासारख्या प्रतिष्ठित राज्यात राज्यपाल म्हणून काम केल्याचा मला अभिमान आहे अशी टिप्पणीही राज्यपालांच्या खुलाशात करण्यात आली आहे. कोश्यारी म्हणाले की, मराठी उद्योगपतींनी केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि जगभरात नाव कमावले आहे. मराठी माणसाला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.