Hinjawadi IT Park: आयटीनगरीत खड्ड्यांचे साम्राज्य! ३७ कंपन्यांनी पळ काढला, तरी प्रशासनाचा खो-खोचा खेळ सुरूच
Hinjawadi IT Park: पावसाच्या पाण्यामुळे मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे; गटार वाहिनी नसल्याने पाणी रस्त्यावर साचून वाहतूक ठप्प.

– रमेश ससार
Hinjawadi IT Park – जगभरात आयटीनगरी अशी ओळख मिळविणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील रस्त्यांची अवघ्या एक महिन्यात अक्षरशः चाळण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी सक्षम गटार वाहिनी नसल्याने सार्वजनिक बांधकाम, एमआयडीसी व पीएमआरडीएच्या क्षेत्रातील मुख्य रस्त्यांची दूरवस्था झाल्याने नित्याने वाहतूक ठप्प होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे हिंजवडी आयटी उद्यानातील अनेक कंपन्या इतर राज्यात स्थलांतरित झाल्याचे यापूर्वी स्पष्ट होऊनही सरकारला याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसून येते. रस्त्यांवरील अतिक्रमणे, मोठमोठे खड्डे, पावसाचे पाणी तुंबने पर्यायाने तासनतास वाहतूक कोंडी होणे या गोष्टी या भागात सातत्याने घडतात. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या शासकीय विभागातील अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
सार्वजनिक बांधकाम, एमआयडीसी व पीएमआरडीए या संस्था आपसात खो-खो खेळत आहेत की काय? असा प्रश्न हिंजवडीकर आणि आयटीयन्सना पडला आहे. हिंजवडीतून 37 कंपन्यांनी पळ काढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी गेल्या वर्षी पाहणी दौरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठका घेऊन तातडीने कामे हाती घेण्याचे आदेश दिले होते.
दर आठवड्याला पाहणी आणि नियमित बैठका घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्व. अजितदादांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे आता हिंजवडीकरांच्या आणि येथे येणाऱ्या लाखो आयटीयन्सची समस्यांमधून सुटका होईल, अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. त्या दृष्टीने कामेही सुरू झाली होती. परंतु आता मात्र येथील समस्यांकडे कुणीही पाहण्यास तयार नाही.
अरुंद रस्ते, मोठ्या प्रमाणात वाहने आणि कोंडी वाढविण्यासाठी खड्ड्यांची भर अशी परिस्िथती आयटीनगरीत दिसून येत आहे. एक वर्ष उलटूनही अद्याप एमआयडीसी पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून काहीच कार्यवाही होताना दिसत नाही. पुन्हा एकमेकांकडे बोटे दाखवत अधिकारी आपली जबाबदारी ढकलून देत असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच अजित दादांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने हिंजवडीला वाली कोण ? अशा प्रतिक्रिया सामान्य नागरीक व आयटीयन्समधून उमटत आहेत. महामार्गावर असलेल्या सेवा रस्त्यावर खड्डे पडल्याने रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. लक्ष्मी चौक रस्ता, माण गावाकडे जाणारा पांडवनगर परिसरातील रस्ता, व एमआयडीसीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून येथील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.






