Road Accident News : हिंगोलीमधील जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपुर शिवारात रविवारी सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ५० ते ६० फूट अंतरावर फेकल्या गेलेल्या कारचा चुराडा झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून एक कार मंठाकडे जात होती. याचवेळी समोरून येणारी ट्रॅव्हलरने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यापासून सुमारे ५० ते ६० फूट अंतरावर फेकली जाऊन तिचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात सय्यद अझर सय्यद महेमूद, सुमैया सय्यद अजहर आणि एका लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला. या तिघांच्या मृत्यूमुळे वसमत परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, कारमधील मरियम उफाद, फरवा आणि सय्यद इस्माईल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत ट्रॅव्हलरमधील ४ ते ५ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रॅव्हलर चालक संतोष केशवराव शिंदे (४९, रा. छ. संभाजीनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. वाहनांचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.