नागपूर – हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील आताची परिस्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते, असे वक्तव्य एका मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले असून हिंदुत्व ही कोणाचीच मक्तेदारी नाही, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले, हिंदुत्व ही कोणाचीच मक्तेदारी नाही. हिंदुत्व जीवनात आणावे लागते, पण जेव्हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब हे जनाब बाळासाहेब ठाकरे होतात, जेव्हा शिवगान स्पर्धा ही बंद होते, अजान स्पर्धा होते तेव्हा असे बोलावे लागते. म्हणून त्यांनी सांगावे की त्यांनी हिंदुत्व का सोडले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फडणवीस म्हणाले, कालच्या ट्वीटनंतर कळले की कशा प्रकारे आंतरारष्ट्रीय षडयंत्र सुरू आहे. भारतात अराजकता निर्माण करण्याची ही योजना बाहेर आली आहे. हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करुन जगात भारताला बदनाम करायचे हे सर्व कालच्या ट्वीटमुळे उघड झाले आहे. शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधीत मोर्चा काढण्याऐवजी राज्यातील कर कमी करावे. शिवसेनेने मोर्चे न काढता, नौटंकी न करता जे आम्ही केले होते ते करुन दाखवावं असे फडणवीस म्हणाले. वीज बिलाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात मोगलाई आली असल्याची टीका देखील फडणवीसांनी केली आहे.