प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती शहरात महात्मा फुले चौकात नुकत्याच झालेल्या दुर्दैवी अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनाने शहरातील बेशिस्त वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी तातडीने निर्णय घेतला आहे. आता सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलीस निरीक्षक विलास नाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पाटबंधारे विभागाचे अधिकारी सुर्वे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि इतर यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक समितीची स्थापना करण्यात येणार असून, या समितीत पोलीस, RTO, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक संस्था आणि समाजसेवकांचा समावेश असेल. पुणे शहराच्या धर्तीवर ही यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही उपाययोजना फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत.महात्मा फुले चौकासह शहरातील ३५ वादग्रस्त ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून, त्या ठिकाणी आवश्यक तेथे स्पीड ब्रेकर बसवले जाणार आहेत. यामध्ये विशेषतः शाळा, महाविद्यालय, मुख्य रस्त्यांना जोडणारे मार्ग यांचा समावेश आहे. यासोबतच वाहतुकीसंबंधी साइनबोर्ड शहरभर लावण्यात येणार आहेत. “ओव्हरलोड अवजड वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे आणि ती पुढेही सुरू राहणार आहे. रात्री ९ नंतरच अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे. दिवसा कोणतीही गाडी नियमभंग करताना आढळल्यास थेट कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा बेशिस्त वाहनांची माहिती पोलिसांना द्यावी.” -चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस निरीक्षक अपघातांची वर्षनिहाय माहिती वर्ष अपघात मृत्यू 2021 – 12 – 12 2022 – 14 – 15 2023 – 11 – 12 2024 – 05 – 5 2025 – 10 – 10 अवजड वाहनांना प्रवेश बंदी -वेळ- सकाळी ७ ते रात्री ९ -ठिकाण- बारामती शहर -अंमलबजावणी- पोलीस, RTO, नगरपरिषद -नागरिकांनी बेशिस्त वाहनांची तक्रार नोंदवावी -अपघात कमी करण्यासाठी व्यापक उपाय योजना