मुंबई – राज्यभरात आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात पुढील 48 तासात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे.
कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातही पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. साताऱ्यामध्ये कोयनेच्या क्षेत्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मन्याड, पैनगंगा, मांजरा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर नांदेड शहराची तहान भागवणारा डॉ. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्प 84.21 टक्के क्षमतेने भरला आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, उमरी, मुदखेड, मुखेड, बिलोली, नांदेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणातून सुरु असलेला विसर्ग आणि धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात 95 हजार 556 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. तर जायकवाडी धरण तब्बल 46 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील जिवंत पाणीसाठा 1014.421 दलघमी आहे. तर फुटामध्ये पाणीपातळी 1510.65 फुट असून, मीटरमध्ये 460.446 मीटर आहे. तर धरण क्षेत्रात पाऊस अजूनही सुरुच आहे.