Heavy Rainfall: चासकमान धरण परिसरात ढगफुटीचा महाप्रलय! वेताळे-साबुर्डीत घरांना पाण्याचा वेढा, संसार उघड्यावर
Heavy Rainfall: १९९७ नंतर प्रथमच चासकमान धरण परिसराने अनुभवला एवढा भीषण पूर; वेताळे आणि साबुर्डी गावात जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त.

Heavy Rainfall – चासकमान धरण परिसरातील वेताळे व साबुर्डी गावांमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसानंतर आलेल्या भीषण महापुराने संपूर्ण परिसराला अक्षरशः जलसमाधी दिली. काही तासांतच ओढ्याने रौद्ररूप धारण करत गाव, शेती, जनावरे आणि संसार उद्ध्वस्त केले. 1997 नंतर प्रथमच या परिसराने एवढा भीषण पूर अनुभवला असून, या आपत्तीने अनेक कुटुंबांचे आयुष्यच उद्ध्वस्त केले आहे.
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास वेताळे गावातील ओढ्याला अचानक आलेल्या महापुराने 14 ते 15 घरांना वेढा घातला. कंबरेएवढे पाणी घरांमध्ये शिरल्याने अन्नधान्य, कपडे, फर्निचर, शेतीची अवजारे, महत्त्वाची कागदपत्रे आणि संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. गावकरी जागे असल्याने जीवितहानी टळली; मात्र गोठ्यांतील जनावरे हलविण्यास वेळ न मिळाल्याने मोठी पशुहानी झाली. या पुरात गोठ्यात बांधलेल्या पाच गायी मृत्युमुखी पडल्या, तर सहा गायी, दोन म्हशी, सात शेळ्या आणि सुमारे 40 कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.
अनेक शेतकर्यांसाठी जनावरे ही उपजीविकेचा मुख्य आधार असल्याने या घटनेमुळे आर्थिकबरोबरच भावनिक धक्का बसला आहे. महापुराचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. ओढ्याचे पाणी तब्बल एक किलोमीटरपर्यंत शेतांमध्ये शिरल्याने बागायती पिके, सुपीक माती, शेतबांध आणि शेतीची संरचना वाहून गेली. अनेक एकरांवरील उभी पिके चिखलाखाली गाडली गेल्याने शेतकर्यांच्या महिन्यांच्या मेहनतीवर काही तासांत पाणी फिरले.
पूराच्या तडाख्यात ओढ्यावरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे नुकसानग्रस्त झाले. वेताळे-साबुर्डी मार्गावरील संरक्षण भिंती कोसळल्या, रस्त्यांचा भराव वाहून गेला आणि वाहतूक धोकादायक बनली. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन तसेच विविध सामूहिक सिंचन योजनांच्या पाइपलाइन पुरात वाहून गेल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही विस्कळीत झाली. ओढ्यालगतच्या विहिरी, विद्युतपंप आणि कृषी यंत्रणांचेही मोठे नुकसान झाले.
पुरात शिवाजी बाबन बोंबले यांची एक गाय वाहून गेली तर एक गाय दगावली. रघुनाथ बाजीराव बोंबले यांच्या दोन गायी वाहून गेल्या व दोन गायी मृत्युमुखी पडल्या. संतोष बाजीराव बोंबले यांची एक गाय व दोन शेळ्या वाहून गेल्या, तर दोन गायी दगावल्या. बाबाजी बाजीराव बोंबले यांच्या दोन गायी, जयराम नामदेव बोंबले यांच्या दोन म्हशी, अशोक गजानन बोंबले यांच्या दोन शेळ्या, विमल सोपान बोंबले यांची एक शेळी व 40 कोंबड्या तसेच राजेंद्र सावळेराम बोंबले यांच्या दोन शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.
भीषण संकटात गावकर्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. व्हॉट्सअॅपद्वारे मदतीचे आवाहन होताच गावातील तसेच बाहेरगावी असलेल्या ग्रामस्थांनी अवघ्या दोन तासांत एक लाख रुपयांचा निधी ऑनलाइन जमा केला. युवकांनी तातडीने किराणा व जीवनावश्यक साहित्य खरेदी करून पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचविले. प्रशासनाची यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ग्रामस्थांनी एकमेकांच्या मदतीला धाव घेत संकटाशी दोन हात केले.
1997 नंतरचा सर्वात मोठा पूर
वेताळे-साबुर्डी परिसराने 1997 नंतर प्रथमच एवढ्या तीव्रतेचा महापूर अनुभवला. काही तासांच्या मुसळधार पावसाने ओढ्याने रौद्ररूप धारण करत घरे, शेती, जनावरे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले. ग्रामस्थांच्या मते, गेल्या जवळपास तीन दशकांतील ही सर्वाधिक विध्वंसक पूरस्थिती ठरली आहे.






