अतिवृष्टीमुळे आता ऊस पीकही संकटात

शेतकरी हवालदिल : तोडणीला उशीर, नोव्हेंबरमधील लागवडीसाठी प्रतिकूल परिस्थिती
नाणे मावळ – मावळात यावर्षी गेल्या एका दशकातील सर्वाधिक पाऊस झाला. नोव्हेंबर महिन्याचा एका आठवडा उलटला असून अद्याप पाऊस निरोप घेण्यास तयार नाही. याचा भात शेतीवर तर विपरीत परिणाम झालाच आहे. परंतु सोबत ऊस पीकही संकटात आले आहे. पावसामुळे ऊस तोडणीला झालेला उशीर आणि नोव्हेंबरमधील लागवडीसाठी देखील प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. भात पीकापाठोपाठ ऊस शेतीही संकटात आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
यंदा पावसाला अंदाजापेक्षा उशिरा सुरुवात झाली. आधी पाऊस येत नव्हता म्हणून शेतकरी व्याकुळ होते तर आता पाऊस जात नाही म्हणून चिंताग्रस्त झाले आहेत. जून महिन्याच्या अखेरीस खऱ्या अर्थाने सुरु झालेल्या पावसाळ्याने असा काही जोर धरला होता की, जुलै महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यानंतर थोड्या थोड्या दिवसांची विश्रांती घेत पाऊस बरसतच होता. परिणामी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही पहिल्यांदाच धरणे पूर्णपणे भरलेली आहेत.
मावळातील उसाच्या शेतीच्या प्रमुख समस्या
पाऊस पडत असताना तो मात्र कधी कमी तर अचानक जास्त प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे नियोजन धोक्यात आले होते. हंगामाच्या सुरुवातीला भात रोपे उगवून येण्या इतपत ही पाऊस सुरू झाला नव्हता. तर अचानक जोरदार पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांना भात लावण्यासाठी भात रोपचं जिवंतच राहिली नाही. त्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की भात रोपे भात खाचरांमध्ये पाणीच राहिले नाही.
एकंदरीतच निसर्गाच्या संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी शेती पिकवली. त्याप्रमाणेच मावळातील ऊसाचे पिकही दोन-अडीच फूट पाण्यात स्वतःचे अस्तित्व धोक्यात घालून उभी राहिली होती. नोव्हेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने मावळातील ऊस भरण्यासाठी अनुकूल स्थिती असते. परंतु अजूनही पाऊस न थांबल्याने ऊसशेती संकटात सापडली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती बिघडण्याची चिन्हें निर्माण झाली आहेत. सुगीचा काळ संकटाचा होऊ लागला आहे. पावसाचा परतीचा प्रवास लांबल्याने तोडणीचा हंगाम उशिरा सुरू होणार आहे तर नोव्हेंबर महिन्यातल्या लागवडीसाठी प्रतिकूल परिस्थिती आहे. जमिनींना वाफसा नसल्याने सर्वच पिकांची पेरणीसुद्धा लांबली आहे.





