काढणीस आलेले पीक गेले वाया : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
आळेफाटा – सोयाबिनसाठी एकरी दहा ते बारा हजार रुपये खर्च करून काढणीसाठी आलेली पिके वाया गेली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे चाळकवाडी परीसरात जवळपास पन्नास ते साठ एकर सोयाबिनचे पिक आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाले असून, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी किमान पस्तीस ते चाळीस हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
चाळकवाडी (ता. जुन्नर) परीसरात झालेल्या परतीच्या पावसामुळे येथील सहाणवाटमळा शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. चाळकवाडी परीसरात गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका, ज्वारी, भुईमूग आणि कडधान्य आदी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
येथील शेतकरी अशोक सोनवणे, अंकुश सोनवणे, सहदेव सोनवणे, शांताराम सोनवणे, अनिल सोनवणे, विलास सोनवणे, नवनाथ सोनवणे आणि परिसरामधील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन, ज्वारीच्या आणि भुईमुगाच्या पिकात पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी आहे, तर काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सोयाबीन पावसात भिजल्यामुळे सोयाबीनच्या शेंगांमधून मोड फुटले आहेत.