Mumbai BEST Election Result | ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणूकीत मोठा फटका बसला आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीने बेस्ट पतपेढी निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलला 21 पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील तब्बल ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजपने पैशांचा प्रचंड वापर केला. या पैशासमोर आम्ही हरलो, असं मत सुहास सामंत यांनी व्यक्त केले आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांची सेवा करा सुहास सामंत म्हणाले, बेस्ट पतपेढी निवडणूक झाली, त्याचा निकाल काल आला असून आम्ही दुर्दैवाने हरलो आहे. जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गेल्या नऊ वर्षांमध्ये आम्ही बेस्ट पतपेढी ज्या उंचीवर नेऊन ठेवली आहे, ती उंची टिकवून ठेवा. बेस्टच्या कर्मचाऱ्यांची सेवा करा, एवढीच विनंती मी करतो, असं त्यांनी म्हटले आहे. हल्ली ट्रेंडच बदललाय पुढे म्हणाले, माझ्याकडे स्वत:कडे बेस्टचे 12 हजार कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात पैशांचा प्रचंड ओघ आला. त्यापुढे आम्ही टिकू शकलो नाही. मला वाटलं कर्मचारी पैसे घेऊन मतदान करणार नाहीत. मी बेस्ट वाचवण्यासाठी जे प्रयत्न करतोय, त्यामुळे कर्मचारी माझ्यासोबत राहतील, असं मला वाटलं होतं. पण हल्ली ट्रेंडच बदलला आहे. आम्ही पैशांच्या बाबतीत आणि संपर्क साधण्यात कमी पडलो, अशी स्पष्ट कबुली सुहास सामंत यांनी दिली आहे. भाजपने या निवडणुकीत पैशांचा वापर केला भाजपने या निवडणुकीत प्रचंड पैसा, अधिकारांचा वापर आणि संपूर्ण यंत्रणा उतरवली होती. साध्या पतपेढीच्या निवडणुकीत भाजप सर्व ताकदीनिशी उतरतो, ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. जेव्हा भाजपला कुठली गोष्ट मिळत नाही, तेव्हा अशाप्रकारे सत्तेचा आणि पैशांचा वापर करतात आणि समोरच्याला हतबल करतात, असं सुहास सामंत यांनी म्हटले आहे. ‘जागा दाखवली’ प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधुंना टोमणा भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘जागा दाखवली’ असं म्हणत ठाकरे बंधुंना टोमणा मारला आहे. “बेस्ट इलेक्शनमध्ये ‘ठाकरे’ ब्रँड 21 समोर 000,””00/21 म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत,” असंही लाड यांनी शेअर केलेल्या फोटोत म्हटलं आहे. फेसबुकवर ‘उबाठा आता तरी हवेतून खाली या,’ असा खोचक सल्ला प्रसाद लाड यांनी दिला आहे.