Heatwave Alert: एप्रिल महिन्याच्या अखेरीसच देशात उष्णतेचा तडाखा तीव्र झाला आहे. सकाळपासून कडक ऊन, दुपारी गरम वारे आणि रात्रीही कमी न होणारे तापमान यामुळे लोकांचे हाल होत आहेत. हीच परिस्थिती पुढे ‘हीटवेव’ म्हणजेच उष्माघाताचा धोका वाढवणारी ठरते. विशेषतः लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि आधीपासून आजारी असलेल्या लोकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक असते. तज्ज्ञांच्या मते, उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि डिहायड्रेशन, चक्कर येणे, उलटी, अशक्तपणा यांसारख्या समस्या वाढतात. योग्य काळजी घेतली नाही तर उष्माघात होण्याची शक्यता असते, जी जीवघेणी ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, आपले शरीर सामान्य परिस्थितीत स्वतःचे तापमान नियंत्रित करू शकते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी घाम येतो आणि तो वाफेच्या रूपात उडून गेल्यावर शरीर थंड होते. पण आर्द्रता (ह्युमिडिटी) जास्त असल्यास घाम व्यवस्थित वाफ होऊ शकत नाही, त्यामुळे शरीराला थंड होणे कठीण जाते. जेव्हा शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही, तेव्हा ती आत साचू लागते. यामुळे ‘हायपरथर्मिया’ नावाची स्थिती निर्माण होते. हीच स्थिती पुढे जाऊन उष्माघातात बदलू शकते. शरीराचे तापमान झपाट्याने वाढणे, घाम येणे थांबणे, डोकेदुखी, हृदयाची गती वाढणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. heatwave विशेषतः जेव्हा तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे जाते, तेव्हा धोका अधिक वाढतो. शहरांमध्ये सिमेंटच्या इमारती, वाहने आणि प्रदूषणामुळे उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होतो. त्यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञ सांगतात की, उष्माघातापासून वाचण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी पिणे, दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत शक्यतो बाहेर न जाणे, हलके आणि सैल कपडे घालणे या गोष्टी पाळल्या पाहिजेत. बाहेर जाण्यापूर्वी पाणी पिणे आणि डोक्यावर टोपी किंवा कापड ठेवणेही उपयुक्त ठरते. जर शरीरात अस्वस्थता, चक्कर, ताप किंवा थकवा जाणवत असेल, तर लगेच सावलीत विश्रांती घ्यावी आणि शरीर थंड करण्याचा प्रयत्न करावा. गंभीर स्थितीत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. एकूणच, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी आणि सवयी अंगीकारल्यास उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.