Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसानंतर आता उष्णतेने जोरदार पुनरागमन केले असून नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यासह अनेक जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आता तापमानात वाढ होत असून, उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर पुढील 24 तासांत कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईमध्येही तापमान वाढीचा इशारा देण्यात आला असून पुढील पाच दिवस महत्वाचे असून उकाडा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शहराचा पारा 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून वातावरण कोरडे राहील, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. अकोला येथे शुक्रवारी राज्यातील उच्चांकी 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर निफाड येथे नीचांकी 15.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मे महिना सुरू होण्यापूर्वीच वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तज्ज्ञांनी नागरिकांना कडक उन्हात घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान अवकाळी पावसासोबत गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. विशेषतः गहू, हरभरा, कांदा, द्राक्षे आणि आंबा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. हेही वाचा : Sugarcane Juice: उन्हाळ्यात ऊसाचा रस म्हणजे आरोग्याचा खजिना; फायदे अनेक, पण ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!