मुंबई : राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या असह्य झळा जाणवल्या. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. आता हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली. मार्च महिन्यात उष्णतेचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असून अंगाची लाही लाही होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील काही भागात उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा मार्च अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या बहुतांश भागात मार्च महिन्यात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. उन्हाच्या झळा आणखी वाढणार आहे. तसेच या काळात 9 ते 15 दिवसांपर्यंत टिकून राहणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, यंदा उन्हाळ्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा तापमानाचा पारा जास्त राहण्याची शक्यता हे. या काळात सगळीकडे किमान तापमानात देखील मोठी वाढ होणार आहे. मार्च महिन्यापासूनच उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून याबाबत हवामान विभागाने इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजारात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत उष्णतेचा तीव्र लाटांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एल-निनोचे संकेत 1901 पासूनच्या नोंदीनुसार फेब्रुवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा आतापर्यंत सर्वोच्च पातळीवर होता. तर कमाल तापमान आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च ठरले. पश्चिम किनारपट्टीवरील केरळ, कर्नाटकसह कोकणात उष्णतेची लाट होती. सध्या सौम्य ‘ला-निना’ स्थिती असून, लवकरच तटस्थ ‘एल-निनो” निर्माण होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती कायम राहणार असल्याने मॉन्सूनवर कोणताही प्रभाव पडणार नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.