रेल्वे पोलिसांचे प्रसंगावधान : रुळाच्या मधोमध पडल्याने इंजिन, तीन डबे जाऊनही बचावला
खाकीने दाखविली माणुसकी
प्रकाश माळी यांनी तीन दिवसांपासून काहीही खाल्ले नव्हते. यामुळे त्यांना अशक्तपणा आल्याने त्यांना चक्कर आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे पोलिसांनी प्रकाश यांना चिंचवड पोलीस चौकीत नेऊन त्यांना जेवण दिले. त्यांच्यावर औषध उपचार करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत पाठवून दिले. चिंचवड रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पिंपरी – घरी अठरा विश्व द्रारिद्य्र असल्याने तो कामाच्या शोधत तो उद्योगनगरीत आला होता. मात्र जवळ पैसे नसल्याने तीन दिवस त्याची उपासमार झाली. रेल्वे स्टेशनला काही काम मिळेल या आशेने तो चिंचवडला आला. प्लॅटफार्मवर चालत असताना पोटात अन्न नसल्याने त्याला चक्कर आली व तो रेल्वे रुळावर पडला. त्यावेळी अचानक रेल्वे आली. ही घटना पाहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रेल्वे थांबवण्यासाठी मोटारमॅनला इशारा केला आणि रेल्वे थांबली. दैव बलवत्तर म्हणून रेल्वेचे इंजिन आणि तीन डबे अंगावरून जाऊन तो बचावला. पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रकाश भागवत माळी (वय 38, रा. शहापूर, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे रेल्वे अपघातातून बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर अनिल बागुल आणि तुकाराम वाळेकर अशी रेल्वे थांबविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. रेल्वे पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, गावाला काम नसल्याने शहरात जाऊन काम मिळविण्यासाठी मध्य प्रदेशातून प्रकाश माळी हे पिंपरी चिंचवड शहरात आले. प्रयत्न करूनही त्यांना काम मिळाले नाही. त्यातच जवळचे पैसे संपल्याने त्यांची तीन दिवस उपासमार झाली. रेल्वे स्टेशनला काही काम किंवा खायला मिळेल, या आशेने बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ते चिंचवडला आले.
प्लॅटफार्मवर चालत असताना उपासमारीमुळे त्यांना चक्कर आली. त्याचवेळी पुणे-पनवेल पॅसेंजर चिंचवड रेल्वे स्थानकावर आली. रेल्वे रुळाच्या मधोमध पडल्याने वरून रेल्वेचे इंजिन व तीन डबे गेले. ही घटना पाहणाऱ्या पोलीस कर्मचारी बागुल आणि वाळेकर यांनी रेल्वे थांबविण्याठी मोटारमॅनला इशारा केला. काहीतरी गडबड आहे हे मोटारमॅनच्या लक्षात येताच त्यांनी त्वरीत रेल्वे थांबवली. रेल्वे थांबल्यावर प्रकाश यांना बागुल आणि वाळेकर यांनी सुखरूपपणे बाहेर काढले.