Haveli News – लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या कचरा टाकण्याच्या जागेवरून उद्भवलेला पेच सोडवण्यासाठी अखेर प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या दालनात सोमवारी (दि. ९ मार्च)दुपारी ४ वाजता या संदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. महेश चोपडे यांच्या विनंतीवरून बैठक आयोजित केली आहे. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख, पुणे जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी आधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक आधिकारी, हवेली पंचायत समितीचे गटविकास आधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामविकास आधिकारी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव व लोणी काळभोरच्या अपर तहसिलदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कचऱ्यासंदर्भात यापुढे काय भूमिका घ्यायची ? कचरा व्यवस्थापन प्रकल्प कुठे व कसा तयार करायचा या बद्दल निर्णय होणार आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींचा मुळा-मुठा नदी परिसरात टाकण्यात येणारा कचरा प्रश्न स्फोटक बनला आहे. कचऱ्याला शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी) अचानक आग लागली होती. ही आग चार दिवस सतत धुमसत राहिली. यामुळे संपूर्ण भागात विषारी वातावरण निर्माण झाले होते. या धुराचा सर्वाधिक फटका एमआयटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांना बसला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांना विद्यापीठाच्या परिसरातून नदीकडे जाण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली होती. कचऱ्याच्या गाड्यांचा मार्ग बंद झाल्याने दोन्ही गावांमध्ये कचऱ्याचे ढीग रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांवर साचू लागले आहेत. या विषयावर तोडगा काढण्यासाठी पुणे पोलीस दलातील परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त डाॅ राजकुमार शिंदे व सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ही बैठक होणार आहे.