Harbhajan Singh on IND vs PAK Match : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी भारताचे माजी फिरकीपटू हरभजन सिगने मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये असून, या सामन्याला अनेक चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांचा विरोध आहे. यामागचे कारण आहे भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय संबंध, विशेषतः पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे निर्माण झालेली परिस्थिती. “क्रिकेट खेळण्यात काही अर्थ नाही” – टाइम्स ऑफ इंडियाशी खास बातचीत करताना हरभजन सिंग म्हणाला, “हा सामना सहज टाळता येऊ शकला असता. सीमेवर आपल्या जवानांनी केलेला संघर्ष आपण विसरू शकत नाही. जेव्हा दोन्ही देशांमधील सीमेवर एवढा तणाव आहे, तेव्हा क्रिकेट खेळण्यात काही अर्थ नाही.” “जवानांच्या बलिदानापुढे क्रिकेट ही फार छोटी गोष्ट” – हरभजन सिंग पुढे म्हणाला, “लोकांनी समजून घेतले पाहिजे की, काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही. सीमेवर उभे असलेले जवान आपल्या कुटुंबाला फार कमी वेळा भेटतात. काही जवान घरी परततात, तर काही कधीच परतत नाहीत. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची किंमत कधीच चुकवली जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत क्रिकेट ही फार छोटी गोष्ट आहे.” हेही वाचा – Jayden Seales : जेडेन सील्सने रचला इतिहास, पाकिस्तानविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही” – हरभजन सिंगने सरकारच्या भूमिकेचाही पाठिंबा दर्शवला. तो म्हणाला, “दोन्ही देशांमधील परिस्थिती सध्या बिकट आहे. अशा वेळी क्रिकेट खेळणे योग्य नाही. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत आपण पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये.” हेही वाचा – ICC Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फेरबदल; रोहित-तिलकची भरारी तर बाबर-हेडची घसरण “देश सर्वात मोठा” – हरभजन सिंगने शेवटी ठामपणे सांगितले, “आपली ओळख ही देशामुळे आहे, मग तुम्ही खेळाडू असाल किंवा अभिनेता. देशापुढे काहीही मोठे नाही. क्रिकेट सामना खेळणे ही देशाच्या तुलनेत अगदी किरकोळ गोष्ट आहे.” या वक्तव्यासह हरभजन सिंगने भारत-पाकिस्तान सामन्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली असून, देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.