Hadapsar Accident – पुणे शहरात भरधाव टँकर आणि डंपरमुळे होणारे अपघात आता केवळ आकडेवारी राहिलेली नाही तर ते अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर कोरलेली जखम बनले आहेत. कोणाची मुलगी, कोणाचा मुलगा, तर कोणाचा संसाराचा आधार हिरावला जात आहे. एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे आयुष्यभराचा अंधार निर्माण होत आहे. नुकत्याच कोंढवा आणि वानवडी येथील अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पण, तरीही प्रशासनाची झोप उडालेली दिसत नाही. अशातच हडपसरमध्ये घडलेल्या एका अपघाताने पुन्हा एकदा शहराला हादरवून सोडले आहे. तो फक्त मित्र नव्हता… हडपसर परिसरात राहणारे नितीन बंबोली (४४) हे नेहमीप्रमाणे आपल्या कामात गुंतले होते. गुरुवारी दुपारी त्यांना एक फोन आला, फोनच्या दुसऱ्या टोकाला मित्र प्रतिक शेठ यांच्या पत्नी होत्या. प्रतीकचा अपघात झाला आहे. लगेच या, एवढंच त्या म्हणाल्या. हे शब्द ऐकताच नितीन यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात पोहोचले. नितीन बंबोली यांच्या जबाबातील शब्द मन सुन्न करणारे आहेत. प्रतिक फक्त मित्र नव्हता, तो माझ्या आयुष्याचा एक भाग होता. आम्ही शाळेपासून एकत्र होतो. एका क्षणात सगळं संपलं. मागे राहिल्या त्या फक्त आठवणी. अवजड वाहनांची वाहतूक. काही क्षणात सर्व काही संपलं पोलिसांनी सांगितले की, दुपारी सुमारे १.४५ वाजता, हडपसरमधील रविदर्शन चौकाजवळ प्रतीक शेठ ( ४३, रा. रास्ता पेठ) हे आपल्या दुचाकीवरून उरुळी कांचनकडे जात होते. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव पाण्याच्या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की प्रतीक रस्त्यावर कोसळले. साक्षीदारांच्या मते, टँकर चालकाने वाहन थांबवण्याऐवजी वेग वाढवला. टँकरचे चाक प्रतीक यांच्या डोक्यावरून गेले आणि त्या क्षणीच सर्व काही संपले. अपघातानंतर काही स्थानिकांनी टँकर थांबवला. चालकाने आपले नाव अविनाश जाधव असे सांगितले. मात्र, गोंधळाचा फायदा घेत तो घटनास्थळावरून फरार झाला. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे जखमी अवस्थेत असलेल्या प्रतीक यांना वेळेत रुग्णालयात नेले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणात टँकर चालकासोबतच टँकर मालक उमेश जाधव यांनाही आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात टँकर चालक आणि मालकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक आणि मालक अटक तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजगार यांनी सांगितले की, चालक आणि मालक दोघांना अटक करण्यात आली आहे. अवजड वाहन असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना, अद्ययावत सुविधा तसेच ३६० कॅमेरा असणे आवश्यक होते. मात्र, त्या नसताना ही वाहनाचा वेग योग्य ठेवला नाही. तसेच, एका व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण केला.