Ashish Nehra on Shubman Gill Form : गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा हे कर्णधार शुबमन गिलच्या सध्याच्या फॉर्मवर होत असलेल्या घाईगडबडीतील टीकेमुळे नाराज आहेत. नेहरा यांनी स्पष्ट केले आहे की, टी-२० सारख्या अस्थिर फॉरमॅटमध्ये केवळ दोन सामन्यांच्या कामगिरीवरून एखाद्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवणे, हे निष्कर्ष काढण्याच्या वाढत्या प्रवृत्तीचे लक्षण आहे. आशिया चषकादरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय संघात उपकर्णधार म्हणून परतलेल्या गिलने मागील १० सामन्यांत १४० पेक्षा कमी स्ट्राइक रेटने एकूण १८१ धावा केल्या आहेत. गेल्या दोन सत्रांमध्ये गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक म्हणून गिलला जवळून पाहिलेल्या नेहरा यांना आयपीएल सुरू होण्यास तीन महिने बाकी असताना गिलच्या फॉर्मची चिंता आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. आशिष नेहरा काय म्हणाले? आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नेहरा यांनी उत्तर दिले, “तीन महिने सोडा, जर आयपीएल तीन आठवड्यांनंतरही सुरू झाले असते तरी मला चिंता वाटली नसती, कारण तुम्ही टी-२० सारख्या फॉरमॅटबद्दल बोलत आहात. जर मी चुकीचा नसेन, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ दोनच सामने खेळले गेले आहेत.” हेही वाचा – Salil Arora : पंजाबच्या सलिलचा ‘SMAT 2025’ मध्ये धुमाकूळ! ३९ चेंडूत शतक ठोकत ऑक्शनपूर्वी फ्रेंचायझींना दिला संदेश नेहरा यांचे मत आहे की, भारतातील टीकेची मूळ समस्या म्हणजे केवळ आकडेवारी पाहून लगेच निष्कर्षांवर पोहोचणे. ते म्हणाले, “हीच आपली समस्या आहे. या फॉरमॅटमध्ये (आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा आयपीएल) शुबमन गिलसारख्या खेळाडूचे दोन-तीन सामन्यांत चांगले प्रदर्शन झाले नाही म्हणून त्याला लगेच जज केले गेले तर खूप कठीण होईल.” ‘तुमच्याकडे खूप पर्याय आहेत’ – त्यांच्या खास व्यंगात्मक शैलीत नेहरा यांनी सांगितले की, जर संघाला बदल करायचे असतील तर पर्यायांची अजिबात कमतरता नाही. ते म्हणाले, “तुमच्याकडे खूप पर्याय आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलला हटवून साई सुदर्शन आणि ऋतुराज गायकवाड यांना सलामीला पाठवू शकता.” ते पुढे म्हणाले, “जर तुम्हाला यांनाही (साई आणि ऋतुराज) हटवायचे असेल, तर वॉशिंग्टन सुंदर आणि ईशान किशन यांच्याकडून सलामी देऊ शकता. त्यामुळे पर्याय खूप आहेत.” हेही वाचा – RCB : आरसीबीच्या चाहत्यांसाठी IPL 2026 पूर्वी मोठी बातमी! होम ग्राऊंड पुणे असणार की बंगळुरु? झालं स्पष्ट नेहरा म्हणाले, “जर तुम्ही एक-दोन सामने हरले किंवा एखाद्या फलंदाज/गोलंदाजाचे आकडे चांगले नसले आणि तुम्ही त्यांना बदलण्याची चर्चा करत असाल, तर मग समस्या निर्माण होईल.” गेल्या हंगामात वॉशिंग्टन सुंदरला टायटन्सकडून केवळ सहाच सामने खेळायला मिळाले होते, पण नेहरा यांनी संकेत दिले की तो फिट राहिल्यास यावेळी त्याचा अधिक वापर केला जाईल.