अहमदाबाद – सामान्यात: निवडणूक जिंकल्यावर सरकार स्थापन करण्यासाठी आमदार कमी पडत असले की इतर पक्षांचे आमदार पळवले जातात. तसेच एखादे सरकार पाडायचे असेल अर्थात विश्वासदर्शक ठरावावर मतदानाच्या वेळीही आमदारांची पळवापळवी होती. मात्र गुजरात राज्यात वेगळाच प्रकार पाहायला मिळतो आहे. ते म्हणजे आम आदमी पक्षाचे राज्यात अजुन आमदारच नाहीत. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी (AAP’s Gujarat polls candidates moved to unknown location) ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांना पळवले जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी उमेदवारांनाच अज्ञात स्थळी हलविले आहे.
त्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आपचे सूरत पूर्व मतदारसंघातील उमेदवार कांचन जरीवाला यांनी नाट्यमय रित्या माघार घेतली होती. जरीवाला अचानक गायब झाले होते व ते प्रकटले ते थेट त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीच. तेही प्रचंड पोलीस बंदोबस्तात. त्या घटनेनंतर पक्षाने ही सावधगिरीची भूमिका घेतल्याचे मानले जाते आहे. भारतीय जनता पार्टीनेच आमच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप आपने केला आहे व हा आरोप भाजपने अगोदरच फेटाळला आहे.
Election Commission met AAP delegation led by Dy CM Manish Sisodia. They alleged coercion of candidate from Surat East for withdrawing his candidature & being taken to an undisclosed location. A representation has been sent to CEO Gujarat to enquire & take action as warranted:ECI
— ANI (@ANI) November 16, 2022
आता उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याच्या संदर्भात बोलताना आपच्या एका नेत्याने सांगितले की, दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानापूर्वी ही खबरदारी घेण्यात आली आहे. या उमेदवारांवरही अर्ज मागे घेण्याबाबत भाजपकडून दबाव टाकला जात होता असा त्यांचा दावा आहे.
आप तिकीट विकतो
दरम्यान, कांचन जरीवाला प्रकरणात भाजपच्या नेत्या शाझीया इल्मी यांनी खळबळजनक आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठीच आम आदमी पक्ष असले प्रकार करतो. विशेष म्हणजे आपकडून तिकीटासाठी पैसे घेतले जातात. त्यांना जरीवाला यांच्याकडून पूर्ण पैसे मिळाले नसतील तर त्यांनीच जरीवाला यांचे अपहरण केले असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीत दाखल होण्यापूर्वी शाझीया इल्मी आपच्या दिल्लीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होत्या.