Newasa News : नेवासा येथे ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा’ला प्रारंभ; संत-महंतांच्या उपस्थितीत भक्तिभावाचा उत्सव
Newasa News : ब्रम्ह विद्येची खान असलेल्या ज्ञानेश्वरीचे श्रवण मनन चिंतन केल्यास मनुष्याला जीवनात विवेकाची प्राप्ती होईल असे प्रतिपादन वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांनी यावेळी बोलताना केले.

नेवासे : ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने वेदांताचार्य महंत श्री देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय “ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चिंतन सोहळयास संत माऊलींच्या मूर्तीचे पूजन करून दिपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला. ब्रम्ह विद्येची खान असलेल्या ज्ञानेश्वरीचे श्रवण मनन चिंतन केल्यास मनुष्याला जीवनात विवेकाची प्राप्ती होईल असे प्रतिपादन वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी ज्ञानेश्वर चिंतन सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री,देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग,रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे महंत स्वामी ज्ञानेश्वरजी महाराज, राम महाराज खरवंडीकर, अंजाबापू महाराज कर्डीले, कोंडीराम महाराज पेचे,हरि महाराज भोगे, मंगेश महाराज वाघ, कोंडीराम महाराज पेचे, राजेंद्र महाराज आसने, विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, भिकाजी जंगले, रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव, जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे, डॉ. संजय सुकाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी आलेल्या सर्व संत महंत व माऊली भक्तांचे संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील ५४ व्या श्लोकात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना “स्थितप्रज्ञ कोण?” असा प्रश्न विचारला त्यावर भगवान श्रीकृष्णांनी संत, महात्मा, ज्ञानी पुरुष यांचे स्वरूप स्पष्ट करणारे अमूल्य विचार मांडले याच श्लोकांचे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील शेवटच्या ८६ ओव्यांमधून अत्यंत सखोल आणि रसाळ विवेचन केले ते विवेचन आपल्याला वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांच्या वाणीतून श्रवण करायला मिळणार असल्याने माऊली भक्तांनी ज्ञानेश्वरी चिंतन सोहळयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी ज्ञानेश्वरीच्या चिंतन सोहळयात बोलतांना वेदांताचार्य देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री म्हणाले की मानवी जीवनाला स्पर्श करणारे ज्ञान संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितले, सर्व मानव जातीचे पुण्य फळा आले म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी जगाच्या उद्धारासाठी दिली.ग्रंथात श्रेष्ठ असलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे त्यामुळे ज्ञानेश्वरी विषयी अंतकरणात परम आदर श्रध्दा भाव विश्वास ठेवा,ती ब्रम्ह विद्येची खान,तिला मनामध्ये दृढ करा,जीवनात विवेकाची प्राप्ती होण्यासाठी जीवनात ज्ञानेश्वरीचे मनन चिंतन श्रवण करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
ज्ञानेश्वरी चिंतन सोहळयाच्या पहिल्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.झालेल्या संगीतमय ज्ञानेश्वरी चिंतन सोहळयाच्या प्रसंगी गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे,अंजाबापू कर्डीले,गहिनीनाथ महाराज आढाव यांनी (गायन),नवनाथ महाराज आगळे(मृदुंग),
कृष्णा महाराज कुलकर्णी(तबला)शंकर महाराज तनपूरे (टाळ) यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली.
अधिक पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून सुरू झालेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा सायंकाळी ७ ते ९ यावेळेत होत असल्याने अधिक मासाच्या पर्वकाळात सुरू झालेल्या चिंतन सोहळयाचा माऊली भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने यावेळी करण्यात आले. शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव व देवटाकळी येथील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित भाविकांना आमटी भाकरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.




