अफगाणीस्तानातील युद्धजन्य परिस्थिती चिघळली; भारतीय नागरिकांना आजच्या आज मायदेशी परतण्याचे आवाहन

नवी दिल्ली – अफगाणीस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असून मझर ए शरीफ या शहरात राहणाऱ्या सर्व भारतीय नागरीकांना मायदेशी परत येण्याचे आवाहन भारत सरकारने केले आहे. या शहरावर हल्ला करण्याची तयारी तालिबानने केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने हे आवाहन केले आहे.
आज सायंकाळी उशीरा नवी दिल्लीसाठी विशेष विमान मझर ए शरीफहून सुटेल. या शहरात आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी त्याद्वारे मायदेशी परतावे, असे आवाहन भारताच्या या शहरातील राजदुतांनी ट्विटद्वारे केले आहे.
या विशेष विमानाने जाऊ इचिछणाऱ्यांनी त्यांचे पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक आणि त्याची मुदत संपण्याची तारीख 0785891303/01 या क्रमांकावर पाठवावीत, असे आवाहन करणारे दुसरे ट्विट त्यांनी केले आहे.
तालिबान शहरात प्रवेश केल्याने भारतातने कंदहार दुतावासातील कर्मचाऱ्यांना हलवले आहे. तालिबानने अफगाणस्तिानच्या उत्तरेकडील सहा प्रांतावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित असणाऱ्या काबुलसारख्या शहरांमध्ये लाखो लोकांनी घरदार सोडून आश्रय घेतला आहे.
तालिबानने आता मझर ए शरीफवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. हे अफगाणस्तिानच्या उत्तर भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर त्यांच्या ताब्यात गेल्यास या सर्व भागावरील तालिबान विरोधकांचे वर्चस्व पूर्णत: संपुष्टात येईल.
कंदहार आणि हेल्मंड येथेही सरकारी फौजा तालिबानशी लढत आहेत. दक्षिणेकडील पाश्तो प्रांतातून तालिबानने आपली ताकद कमी केल्याचे वृत्त आहे.





