छत्रपती संभाजीनगर : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे मुख्य आरोपी आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्दाम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पोलिस व तपास यंत्रणेलाही या विषयाला फुलस्टॉप देण्याचे गुप्त आदेश दिलेत, असा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी केला आहे. धनंजय मुंडे हे देशमुख हत्या प्रकरणात 302 चे आरोपी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. जरांगे सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सरकारकडे सगळ्या यंत्रणा आहेत. पण जे जनतेला कळते, ते सरकारला का कळत नाही. धनंजय मुंडे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. पण देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. धनंजय मुंडे यांचे कार्यालय चालवण्याचे काम 1 नंबरचा आरोपी करत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना खंडणी मिळाली आहे आणि त्यांना खूनाचा विषयही माहिती आहे. पण फडणवीस यांनी या विषयाला फुलस्टॉप दिल्याचे आता उघड होत आहे. त्यांनी पोलिस व तपास यंत्रणेला असे गुप्त आदेश दिलेत. फडणवीस एवढ्या निर्घृणपणे हत्या घडवून आणणाऱ्या राजकीय गुंडाला वाचवत आहेत. धनंजय मुंडे हा विषारी साप आहे. हा साप तुमच्यापुढे उभा राहणार आहे. असे होईल तेव्हा तुम्हाला आपल्या कपाळावर पश्चातापाचा हात मारून घ्यावा लागेल. खंडणी मागितल्यानंतर व खून झाल्यानंतरही ही फोनाफोनी झाली. पहिला आरोपी फोन उचलत नव्हता म्हणून या आरोपींनी धनंजय मुंडे यांच्याच कानावर फोन करून सर्वकाही घातले आहे अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे 302 कलमांतर्गत धनंजय मुंडे यांना सहआरोपी करायला हवे, असेही जरांगे म्हणाले.