नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आजपासून जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा चार दिवसांचा असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर आझाद यांचा हा पहिलाच दौरा आहे. या अगोदर आझाद यांना तीन वेळा त्याला विमानतळावरून परत पाठवण्यात आले होते.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरविषयीचे कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यात तणावाचे आणि दहशतीचे वातावरण असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच गुलाम नबी आझाद यांनी यापुर्वी राज्यात एन्ट्री करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला होता. परंतु, सरकारने सुरक्षेचे कारण देत त्यांना विमानतळावरुनच परत पाठवले होते. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जम्मू-काश्मीरचा सशर्त दौरा करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी आझाद श्रीनगर विमानतळावर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात ते अनंतनाग आणि बारामुला येथील दैनंदिन मजुरांना भेटतील तसेच त्यांच्या काही समस्या असतील तर त्या जाणून घेण्याचा आझाद प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आझाद यांना जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर, जम्मू, बारामुल्ला, अनंतनाग या चार जिल्ह्यांचा दौरा करण्यास परवानगी दिली आहे.