Ghodivali Anjarun Bridge : बळी गेला, तरीही प्रशासन झोपेतच! घोडीवली-अंजरुणचा जीर्ण पूल ठरतोय जीवघेणा; ग्रामस्थ आक्रमक
Ghodivali Anjarun Bridge : घोडीवली, नावंढे आणि परिसरातील गावांना जोडणाऱ्या मुख्य पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण; पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहू लागल्याने अपघातांचा धोका वाढला.

Ghodivali Anjarun Bridge – घोडीवली, नावंढे आणि परिसरातील गावांच्या दळणवळणाचा मुख्य आधार असलेला घोडीवली-अंजरुण मार्गावरील पूल सध्या जीवघेणा ठरत आहे. अनेक वर्षांपासून संरक्षण कठडे नसणे, पुलावरील काँक्रीट उखडून मोठमोठे खड्डे पडणे आणि पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहणे या गंभीर समस्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच पुलावरून वाहून जाऊन एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तरीही संबंधित यंत्रणेने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने संताप व्यक्त होत आहे.
घोडीवली आणि नावंढे ही दोन ते अडीच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेली गावे आहेत. या गावांना पुणे-मुंबई महामार्गासह परिसरातील इतर गावांशी जोडणारा हा पूल अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आला. काळाच्या ओघात पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून दोन्ही बाजूंना संरक्षण कठडे नसल्याने प्रत्येक प्रवास धोकादायक ठरत आहे. घोडीवली-अंजरुण पुलावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी आणि इतर नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते.
पुलावरील खड्डे आणि संरक्षण कठड्यांचा अभाव यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात परिस्थिती आणखी गंभीर बनते. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहू लागल्यास वाहनचालकांना पुलाची खरी स्थिती लक्षात येत नाही आणि अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी केली असली तरी त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.
मान्सून तोंडावर असताना घोडीवली-अंजरुण पुलाची स्थिती चिंताजनक आहे. प्रशासनाने तातडीने संरक्षण कठडे उभारणे, खड्डे बुजविणे, जड वाहनांवर निर्बंध आणणे आणि पुलाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच हालचाल होईल, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
एका दुर्घटनेने उघड केलेले वास्तव
२५ जुलै २०२५ रोजी मुसळधार पावसादरम्यान घोडीवली येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पालांडे हे दवाखान्यात जात असताना पुलावरून दुचाकीसह वाहून गेले. त्यांची मोटारसायकल सापडली, मात्र ते स्वतः कधीच सापडले नाहीत. जवळपास दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कुटुंबीयांनी त्यांना मृत घोषित करून अंत्यविधी पार पाडले. या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरले, पण या घटनेनंतरही पुलाच्या दुरुस्तीकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नाही. आजही पालांडे कुटुंबाने गमावलेली व्यक्ती आणि गावाने अनुभवलेले दुःख नागरिकांच्या मनात ताजे आहे. त्यामुळे आणखी एका बळीची वाट पाहिली जात आहे का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.






