Abu Salem : गँगस्टर अबू सालेमने घेतली उच्च न्यायालयात धाव

मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेला गुंड अबू सालेम याने शिक्षामाफीसाठी आणि तुरूंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारत आणि पोर्तुगाल यांच्यात आपल्या प्रत्यार्पणाबाबत झालेल्या करारानुसार आपण २५ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण केल्यामुळे, आपली तुरुंगातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी सालेम याने याचिकेद्वारे केली आहे.
सालेम याचा याबाबतचा अर्ज विशेष टाडा न्यायालयाने १० डिसेंबर रोजी फेटाळला होता. त्याविरोधात सालेम याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे सालेम याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिका १० मार्च रोजी सुनावणीसाठी ठेवली.
एकूण शिक्षा, कच्चा कैदी म्हणून घालवलेला कालावधी आणि मिळवलेल्या माफीचा समावेश हा कार्यकाळ २५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचा दावा सालेमने याचिकेत केला आहे. त्याच्या याचिकेनुसार, २४ डिसेंबर २०२४ पर्यंत, त्याने दोन प्रकरणांमध्ये झालेली एकूण शिक्षा म्हणून म्हणून २५ वर्षांहून अधिकचा तुरुंगवास भोगला आहे.
नोव्हेंबर २००५ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत त्याने खटला निकाली निघेपर्यंत ११ वर्षे ९ महिने आणि २६ दिवस तुरूंगात काढली. तर फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०२४ दरम्यान २००६ च्या टाडा प्रकरणात दोषी म्हणून नऊ वर्षे १० महिने आणि ४ दिवस तुरूंगात घालवले आहे. याशिवाय, २००६ च्या प्रकरणात चांगल्या वर्तनासाठी त्याला तीन वर्षे १६ दिवसांची माफी मिळाली आहे.





