Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या पूजनात विसरू नका हे खास नियम; जाणून घ्या परंपरा आणि शास्त्र काय सांगते

Ganesh Chaturthi 2025: भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात लोकप्रिय आणि भाविकांच्या हृदयाशी घट्ट जोडलेला सण आहे. बुद्धीचा देव, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती अशा स्वरूपात गणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते. या वर्षी 2025 मध्ये गणेश चतुर्थी बुधवार, 27 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत घराघरांत, मंडपांत आणि मंदिरांत बाप्पाचं पूजन, आरत्या आणि उत्सवाचा जल्लोष रंगणार आहे.
गणेश पूजनाची प्राचीन परंपरा
इतिहास सांगतो की गणेश पूजनाची परंपरा तब्बल साडेतीन हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. भाद्रपद महिन्यात धान्याची कापणी होत असल्याने पृथ्वीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा प्रघात प्राचीन काळापासून आहे. सुरुवातीला नदीकाठी किंवा शेतातील मातीपासून मूर्ती तयार करून पूजन करून लगेच विसर्जन केले जात असे. नंतर मूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवण्याची परंपरा प्रचलित झाली.
गणेश पूजनातील महत्त्वाचे नियम
शास्त्रानुसार गणपती पूजन करताना काही बाबींची विशेष काळजी घेणे आवश्यक मानले जाते.
मूर्ती ८ ते १० दिवस आधी आणता येते, केवळ आदल्या दिवशीच आणावी अशी अट नाही.
गर्भवती स्त्री घरात असली तरी मूर्ती विसर्जन करता येते.
प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती विसर्जनापूर्वी उत्तरपूजा करूनच विसर्जित करावी.
वाहत्या पाण्यात विसर्जन करणे बंधनकारक नाही; तलाव, टाकी किंवा घरी ठेवलेल्या पात्रातही विसर्जन शक्य आहे. मात्र मूर्ती शाडू किंवा मातीची असावी, जेणेकरून ती सहज विरघळेल.
गौरी पूजनाचे महत्त्व
गौरी म्हणजे पार्वती माता आणि काही प्रथेनुसार तिला महालक्ष्मीचे स्वरूपही मानले जाते. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आगमन तर ज्येष्ठा नक्षत्री गौरी पूजन केले जाते.
गौरी मूर्ती तेरड्या, खडे, मुखवटे किंवा मातीच्या स्वरूपात आणल्या जातात.
नैवेद्य दाखवून तो दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा काही घरांत आहे, पण शास्त्र सांगते की नैवेद्य तत्काळ स्वीकारला जातो. त्यामुळे तो लगेच प्रसाद म्हणून ग्रहण करणे योग्य आहे.
घरातील परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा समतोल साधून पूजन केले तर ते अधिक फलदायी ठरते.
आजच्या काळातील अर्थ
आज पर्यावरणपूरक मूर्ती, पाण्याची नासाडी टाळणारे विसर्जन आणि साधेपणातला भव्य उत्सव हे गणेशोत्सवाचं नवं रूप ठरतं आहे. श्रद्धा आणि परंपरा जपत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला, तर बाप्पाचं पूजन अधिक अर्थपूर्ण ठरेल.





