परराज्यातील कामगार निघून गेल्याने अडचणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या बहुतांश हॉटेलमधील कामगार हे परराज्यातील आहेत. यातील अनेक कामगारांनी आपले घर गाठल्यामुळे शहरातील हॉटेल उद्योगांपुढील अडचणीत भर पडली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद असून सुरू कधी होणार याबाबत अनिश्चितता असतानाच आता मजूरही निघून गेल्यामुळे या उद्योगापुढील संकटात भरच पडली आहे.
शहरात लहान मोठी मिळून सुमारे 1200 ते 1300 हॉटेल आहेत. छोटी हॉटेल वगळता मोठ्या हॉटेलमध्ये परप्रांतीय कामगार काम करत आहेत. पन्नास हजारांहून अधिक संख्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची आहे. यामध्ये वेटर, आचार, साफसफाई कामगारांचा समावेश आहे. पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, आसाम, हिमाचल प्रदेश आदी राज्यांतील हॉटेल कामगारांची संख्या मोठी आहे. याशिवाय काही प्रमाणात कर्नाटकातीलही कामगार आहेत.
लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच हॉटेल व्यवसायावर करोनामुळे अडचण निर्माण झाली होती. चायनिजच्या गाड्यांसह मांसाहारी हॉटेलना फेब्रुवारीपासूनच फटका बसण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आजतागायत हॉटेल बंद आहेत. लॉकडाऊन तीनमध्ये इतर काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी, हॉटेलबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच परवानगी कधी मिळेल याबाबत अद्यापही अनिश्चित आहे.
मात्र, दरम्यानच्या कालावधीत शहरातील हजारो कामगार आपआपल्या गावी गेले आहेत. यामध्ये हॉटेलमधील कामगारांचाही समावेश आहे. अगदी बोटावर मोजण्याइतपतही मजूर सध्या शहरात शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे हॉटेलला परवानगी मिळाल्यानंतरही हॉटेल सुरू करणे जिकीरीचे बनणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणार हे आताच स्पष्ट झाले आहे. त्यातच आगामी काळात हे मजूर कधी होणार याबाबतही अनिश्चितता असल्यामुळे हॉटेल उद्योगापुढे संकट उभे राहिले आहे.